• Mon. Mar 9th, 2026

    ‘माझ्या हत्येचा कट होता; पण ही शेवटाची सुरुवात’, शाईफेकीनंतर प्रवीण गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया

    ‘माझ्या हत्येचा कट होता; पण ही शेवटाची सुरुवात’, शाईफेकीनंतर प्रवीण गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया

    Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली, ज्यामुळे तणाव निर्माण झाला. गायकवाड यांनी या हल्ल्यासाठी थेट सरकारला जबाबदार धरले असून, हा त्यांच्या हत्येचा कट असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे पुरोगामी विचारधारेचे कार्यकर्ते असुरक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, तसेच या हल्ल्यामागे षडयंत्र असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज शाईफेकीची घटना घडली. या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकावर आरोप केले. आपल्यावरील हल्ल्याच्या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे, असं प्रवीण गायकवाड म्हणाले. तसेच आपल्या हत्येचा कट होता आणि ही शेवटाची सुरुवात आहे, असंदेखील प्रवीण गायकवाड म्हणाले आहेत. “मी अक्कलकोटला गेलो होतो. अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं वंगन तेल टाकलं. त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट खरी आहे. पण ही विचारधारा जी आहे, तुम्हाला आठवत असेल, डॉ. पानसरे यांचा खून झाला. डॉ. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाला. डॉ. गौरी लंकेशचा खून झाला. या सत्ताकाळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत”, असं प्रवीण गायकवाड म्हणाले.

    ‘ही शेवटाची सुरुवात’

    “कधीकधी पक्ष फोडले जातात, पक्षांनंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यांच्यासारखी कुठली गोष्ट करता नाही आली, आम्ही एक सत्य विचारसरणीचं काम करतो. आमचा विचार हा राज्यघटनेला अपेक्षित असलेला समता, बंधूता, न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे. या देशात मानवता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेडचं काम चालू आहे आणि ते चालू राहणार आहे. पण दुर्दैवाने अशा सामाजिक संघटनांबाबत काही गैरसमज पसरवले जातात. मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करतात”, असं प्रवीण गायकवाड म्हणाले.”मी या घटनेचा निषेध करणार नाही. पण एक निश्चित सांगतो, ही शेवटाची सुरुवात आहे. संभाजी ब्रिगेडचा इतिहास सर्वांना माहिती आहे. संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे. राज्यकर्त्यांमध्ये मुख्यत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. मी कार्यक्रमात पोहोचलो त्यावेळेस कोणत्याही प्रकारची पोलीस यंत्रणा नव्हती”, अशी प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी दिली.

    ‘माझ्या हत्येचा कट होता’

    “अशावेळेसे मला वाटते की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथे नव्हती का? काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का? माझ्या जीविताला धोका होता का? माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळे मी जिवंत आहे. मला आनंद वाटतो की, या पुढच्या काळात काहीतरी चांगलं काम करायचं असल्यामुळे हे नवीन जीवन मिळालं”, असा दावा प्रवीण गायकवाड यांनी केला.

    संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं, नेमकं काय घडलं?

    “माझ्या हत्येचा कट होता. माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झाला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले असतील, त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी जिवंत आहे. अन्यथा माझ्यावर हल्ला झाला होता. याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे”, असं प्रवीण गायकवाड स्पष्ट म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा