• Tue. Mar 10th, 2026
    मुंबई-गोवा महामार्गावरून अजितदादांच्या शिलेदाराचा घरचा आहेर, सामंत आणि निकम यांची परस्परविरोधी विधानं चर्चेत

    Mumbai Goa Expressway : कोकणात गेली सुमारे १६ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सध्या कोकणात चर्चेचा विषय ठरला आहे. यंदाही गणेशोत्सवात गावी जाताना याच महामार्गावरुन समस्यांचा सामना करत जावं लागणार आहे. ‘आमचा हा महामार्गच पूर्ण ब्लॅक स्पॉट आहे’ असे बेधडक विधान महायुतीच्याच आमदाराने केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात गेली सुमारे १६ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सध्या कोकणात चर्चेचा विषय ठरला आहे. याच महामार्गाने आजवर अनेकांचे बळी घेतले आहेत, अनेक कुटुंब उध्वस्त केली आहेत. यंदाही गणेशोत्सवात गावी जाताना याच महामार्गावरुन समस्यांचा सामना करत जावं लागणार आहे. कोकणातील चाकरमान्यांचा प्रवाशांचा प्रवास त्यातल्या त्यात सुखकर व्हावा, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी महामार्गाच्या कामात लक्ष घातलं असून ते रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाची पाहणी करत आहेत. मात्र याचवेळी पावसाळी अधिवेशनात अजित दादांचे शिलेदार आमदार शेखर निकम यांनी याच महामार्गावरून लक्षवेधी मांडत विधिमंडळ ‘आमचा हा महामार्गच पूर्ण ब्लॅक स्पॉट आहे’ असं बेधडकपणे सांगत सभागृहात खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी एका अर्थाने सरकारला घरचा आहेर दिला आहे.

    अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत व आमदार शेखर निकम यांच्यात सुरू झालेले शीतयुद्ध आता महामार्गाच्या विषयापर्यंत आल्याचे पाहायला मिळत आहे. तर मुंबई गोवा महामार्ग हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. यावर असलेले खड्डे संरक्षक भिंती आदी कामांमुळे हा महामार्ग वादाचा विषय ठरला आहे. आता सध्या चर्चेत आला आहे तो दोन नेत्यांमधील परस्परविरोधी विधानांमुळे.
    पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी, वाचा नेमकं काय घडलं?
    शिवसेनेचे नेते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ९३.१८% काम महामार्गाचे पूर्ण झालं आहे, असे सांगत आहेत. आरवली ते काटे हे आपल्या नशिबाला आलेले पॅकेज आहे यामध्ये साडेचार किलोमीटरचे काम बाकी आहे. काही ठिकाणी भूसंपादनात अडचणी आहेत. वांद्री येथील मंदिराला हात लागू नये, अशी आमचीही भूमिका होती. त्यामुळे ग्रामस्थांनी दुसरीकडून जागा दिली. पण त्याचे अठरा लाख रुपये ग्रामस्थांना मिळालेले नाहीत आणि या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये काही काम थांबली आहेत आणि काही काम त्याठिकाणी मशीनच चालत नाही इतका दगड कठीण आहे तो फुटत नाही, अशी माहिती सामंत यांनी दिली. दहा-बारा वर्षे काम धीम्यागतीने झालं. ठेकेदारांनी त्यांनी वेळीच काम पूर्ण न केल्यामुळे हा महामार्ग रखडला, अशी भूमिका सामंत आणि चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली आहे.

    सामंत यांनी ही भूमिका मांडून काही दिवस होतात न तोच शेखर निकम यांनी महामार्गाच्या विषयात आक्रमक भूमिका घेत सरकारचे लक्ष वेधले आहे. पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीची अजित दादांचे शिलेदार चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतः गाडीतून फिरून महामार्गावरील ब्लॅक स्पॉट पाहिले. पण आमचा संपूर्ण महामार्गच ‘एक ब्लॅक स्पॉट’ आहे. असे सांगून महामार्गाबद्दल असलेली नाराजी सभागृहात जाहीरपणे व्यक्त केली. इतकंच नाही तर यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत आमदारांची बैठक घ्यावी, अशी मागणीही शेखर निकम यांनी महामार्गाची लक्षवेधी मांडताना केली आहे.

    यावर उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सकारात्मकता दर्शवत, या मुद्द्यावर सर्व आमदारांसोबत एकत्र बैठक घेतली जाईल याचं पत्र गडकरी साहेबांनाही दिले जाईल असे सांगितले आहे. मात्र असं असलं तरी या दोन्ही नेत्यांच्या मुंबई गोवा महामार्गबाबतच्या परस्पर विरोधीविधानांची चर्चा सध्या रंगली आहे.

    शेखर निकम नेमकं काय म्हणाले?

    मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत लोकांची अस्वस्थता, जीवितधोके आणि वाहतुकीतील अडथळे यांवर अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला.पण आमचा संपूर्ण महामार्गच एक ब्लॅक स्पॉट आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत चिपळूण येथील अंडरपास अभावी निर्माण झालेल्या आंदोलनांचीही माहिती यावेळी दिली.

    केंद्रिय मंत्री नितीन गडकरी साहेबांसोबत बैठक घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील व परिसरातील सर्व महामार्गाच्या समस्या एकत्रितपणे सोडवाव्यात अशी मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवत, या मुद्द्यावर सर्व आमदारांसोबत एकत्र बैठक घेतली जाईल व त्याचे पत्रक गडकरी साहेबांनाही दिले जाईल अशी ग्वाही सभागृहात दिली आहे.

    काही दिवसांपूर्वी शेखर निकम यांच्या विरोधात लढवलेले शरद पवार यांचे कट्टर समर्थक उद्योजक प्रशांत यादव यांची थेट भेट उदय सामंत यांनी घेतली होती. इतकंच नाही तर त्यांना शिवसेना पक्षप्रवेशाचे निमंत्रण देत अजितदादांचे राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले होते. या सगळ्या राजकीय घडामोडी ताज्या असताना आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत दोन्ही नेत्यांनी केलेली विधान चर्चेचा विषय ठरला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा