• Mon. Mar 9th, 2026
    आत्याशी लग्न, शुद्धीकरणाच्या नावाखाली जोडप्यासोबत अमानवी कृत्य, शेत नांगरण्यास जुंपलं

    Raigad Couple News: रायगमध्ये एका जोडप्यासोबत अत्यंन अमानवी वर्तन करण्यात आलं आहे. येथे एका पती पत्नीला शिक्षा म्हणून शेत नांगरण्यास जुंपण्यात आले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    रायगड : रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या 21 व्या युगातही असं काही घडू शकतं यावर आपला विश्वासच बसणार नाही. रायगडमध्ये एका आदिवासी जोडप्याला अमानुष शिक्षा देण्यात आली आहे. या जोडप्याने सामुदायिक परंपरेविरुद्ध विवाह केल्याबद्दल सार्वजनिक शिक्षा म्हणून खांद्यावर जोखड ठेवून त्यांना शेत नांगरण्यास भाग पाडण्यात आले. कल्याणसिंगपूर पोलिस हद्दीतील कंजामाजोडी गावात बुधवारी ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे.

    सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

    सोशल मीडियावर शुक्रवारी या घटनेचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आणि हे प्रकरण उघडकीस आलं. यात तरुण आणि महिलेला खांद्यावर जोखड बांधून बैलांप्रमाणे फिरवण्यात आल्याचं दिसत आहे. कंजामाजोडी गावकरी आणि समुदायातील वृद्धांसमोर त्यांना शेत नांगरण्यास भाग पाडण्यात आल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
    Matheran News: माथेरानमध्ये भीषण अपघात, फिरायला आलेल्या पर्यटकांची थार रेलिंग तोडून थेट खड्ड्यात

    आदिवासी नियमांचे उल्लंघन केल्याने शिक्षा

    गावकऱ्यांच्या मते, पारंपरिक आदिवासी नियमांचे उल्लंघन करून विवाह केलेल्या या जोडप्याला सार्वजनिक शुद्धीकरण विधी करण्यात आला. तरुणाने त्याच्या आत्याशी म्हणजे वडिलांच्या बहिणीशी विवाह केल्याचा आरोप आहे. त्यांच्या समुदायामध्ये रक्ताच्या नात्यात अशा विवाह सोहळ्यास मान्यता नाही. हा विवाह झाल्याचे उघडकीस आल्यानंतर, गावातील ज्येष्ठांच्या एका गटाने बैठक बोलावली. त्यात संबंधित जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी शिक्षा सुनावण्यात आली. शुद्धीकरण विधीनंतर समुदायाच्या नेत्यांनी जोडप्याला ताबडतोब गाव सोडण्यास सांगितले. त्यांचा ठावठिकाणा कोणालाही माहीत नाही.

    शुद्धीकरण विधीच्या नावाखाली अमानुषपणा

    गावप्रमुख विश्वनाथ कुर्शीका यांनी सांगितले की, आम्ही शुद्धीकरण विधी केले आणि त्यांना शिक्षा केली. यामुळे त्यांना रक्ताच्या नात्यातील विवाह केल्याने झालेल्या पापापासून मुक्तता मिळेल. असा विधी केला नसता तर गावात पाऊस पडला नसता. यामुळे त्यांच्या पिकाचे नुकसान झाले असते.

    रायगडाचे उपजिल्हाधिकारी रमेश कुमार जेना यांनी या कृत्याचे वर्णन ‘अमानवीय’ असे केले आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी गावाला भेट देणार आहे. चौकशीदरम्यान दोषी आढळलेल्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा