Solapur Married Woman Ends Life: सोलापुरात एका विवाहितेने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. पतीकडे मुलाला देऊन घरातल्या कामाचा बहाणा करत या विवाहितेने आपलं आयुष्य संपवलं. तिने असं का केलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही.
विंचूर (तालुका दक्षिण सोलापूर) गावातील राहत्या घरी विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे. अंघोळ करून कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेने खोलीत जाऊन गळफास घेऊन आयुष्य का संपविले याबाबत पोलीस तपास सुरू आहे. पत्नी घरातील काम करत आहे, त्यामुळे पती मुलाला घेऊन गच्चीवर गेला होता, खाली येऊन पाहताच पतीच्या पायाखालची जमीन सरकली. दार तोडून आत प्रवेश केला, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
अर्ध्या तासात होत्याचा नव्हतं झालं
मी घरातील कामं करते, अंघोळ करते तुम्ही पोराला सांभाळा असे सांगून प्रतिज्ञा बिराजदार हिने मुलाला पतीच्या स्वाधीन केले. अंघोळ करून कपडे बदलण्यासाठी खोलीत गेलेली विवाहित महिला अर्ध्या तासाने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. ही घटना विंचूर (दक्षिण सोलापूर) येथे गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. विंचूर येथील प्रतिज्ञाने सकाळी नेहमीप्रमाणे आंघोळ केली आणि कपडे बदलण्यासाठी स्वतःच्या खोलीत गेली. तिने दार लावून घेतले. अर्ध्या तासाने होत्याच नव्हतं झालं.
UP News: हातावर सॅड इमोजी अन् ‘गुलशन आय मिस यू’चा मेसेज, बारावीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं
गच्चीवरून खाली येऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली
घराच्या गच्चीवर लहान बाळाला खेळवणारा पती सचिन बिराजदार खाली येऊन पाहतो तर दार बंद होते. दोन-तीन वेळा ठोठावले तरी उघडले नाही. त्याने भावाला बोलवले. खिडकीतून पाहिले असता प्रतिज्ञा साडीने बेडवरील अँगलला गळफास लावल्याच्या स्थितीत दिसली. दोघांनी तातडीने दरवाजा तोडून प्रतिज्ञाला खाली उतरवले. सरपंच बाळू पाटील यांच्या मदतीने तिला उपचारासाठी सोलापूरकडे घेऊन गेले. जाताना वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी उपचारापूर्वी घोषित केले. शवविच्छेदन करून प्रेत नातलगाच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पती सचिन बिराजदार याने घटनेची खबर मंद्रूप पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे. पीएसआय चव्हाण आणि हवालदार मुलानी तपास करीत आहेत.
प्रतिज्ञा नर्सिंगचे शिक्षण घेत होती
प्रतिज्ञा बिराजदार याचे माहेर सांगली येथील आहे. लग्नांनंतरही प्रतिज्ञा बिराजदार हिने शिक्षण सुरूच ठेवले होते. अकरावीपर्यंत तिचे शिक्षण झालेले. १२ वी करून नर्स होण्याचे तिचे स्वप्न होते. तशी तिची तयारी सुरू होती. पती सचिन शेती करत होता त्याचे शिक्षणही बेताचेच होते. तिच्या शिक्षणाला कोणाचा विरोध नव्हता तरीही तिने असं का केलं असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिस घटनेमागचे कारणांचा शोध घेत आहेत.

