• Sun. Mar 15th, 2026
    तोट्यातील मार्गावर फुली; उत्पन्नवाढीसाठी पीएमपीकडून मार्गांत बदल; ६४ नव्या मार्गांवर सेवा सुरु

    PMP Bus Pune: गेल्या महिन्यात चार मार्ग बंद करण्यात आले असून, ६४ मार्ग नव्या वेळापत्रकानुसार आणि ठिकाणानुसार बदलण्यात आले आहेत.

    pmp bus (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) उत्पन्न वाढविण्यासाठी कमी प्रवासी संख्या असलेले मार्ग बंद करण्यात येत असून, काही मार्गांत बदलही करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात चार मार्ग बंद करण्यात आले असून, ६४ मार्ग नव्या वेळापत्रकानुसार आणि ठिकाणानुसार बदलण्यात आले आहेत.

    पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून सार्वजनिक प्रवासी सेवा देण्यात येते. पीएमपीचे साधारण ३८१ मार्ग आहेत. दर वर्षी पीएमपीची संचलन तूट वाढत असून, तिकिटांतून मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यामध्ये अजूनही मोठी तफावत आहे. त्यामुळे पीएमपीने एक जूनपासून तिकीटदरात वाढही केली.
    लिफ्टचा दरवाजा बंद केल्याचा राग; 12 वर्षीय मुलाला मारहाण, रहिवाशाचा प्रताप CCTVमध्ये कैद
    त्यामुळे आता उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु, पीएमपी प्रशासनाकडून एवढ्यावरच न थांबता आता कमी उत्पन्न असलेले मार्ग बंद करण्यावर भर देण्यात येत आहे. शिवाय ज्या मार्गावर उत्पन्न मिळत होते; मात्र वेळेचे नियोजन चुकत होते अशा ६४ मार्गांवर नव्याने बस सोडण्यात येत आहेत.

    त्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा विश्वास पीएमपी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रवासी सेवा देण्याबरोबरच वार्षिक संचलन तूट कशी कमी करता येईल, यासाठी पीएमपीचे प्रयत्न सुरू आहेत.
    पुणे पर्यटनस्थळे आता ‘ॲप’वर; जिल्हा प्रशासनाचा पुढाकार, एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती
    दरवाढीनंतर तोट्यात घट
    पीएमपीकडून शहर आणि जिल्ह्यातील ३८१ मार्गांवर प्रवासी सेवा देण्यात येते. तिकीट दर वाढविण्यापूर्वी हे सर्व मार्ग तोट्यात होते. आता तिकीट दर वाढविल्यानंतर एका फेरीत होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यातील तफावत कमी झाली आहे. पीएमपीच्या प्रतिकिलोमीटर उत्पन्नात (ईपीके) सुधारणा झाली आहे. मात्र अद्याप सर्व मार्ग तोट्यातच आहेत. त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
    पालिका निवडणुका डिसेंबरमध्ये? EVMच्या मर्यादित संख्येमुळे तीन टप्प्यांत होणार निवडणुका
    मार्ग बंदचा प्रवाशांना फटका
    पीएमपीकडून कमी उत्पन्न असलेले मार्ग बंद केले जात आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा देणे हे पीएमपीचे प्रमुख उद्दिष्ट आहे; नफा कमविणे नाही. कमी उत्पन्न असल्याचे सांगून मार्ग बंद केल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे पीएमपीने बंद केलेले मार्ग सुरू करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

    पीएमपीच्या ताफ्यात नव्याने बस दाखल झाल्यावर ६४ मार्गावर वेळेचे सुधारित नियोजन करून बस सोडण्यात येत आहेच. शिवाय ज्या मार्गावर उत्पन्न अत्यल्प आहे, असे चार मार्ग बंद केले आहेत. – सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा