• Mon. Mar 16th, 2026

    महापालिका निवडणुकांवेळी महाविकास आघाडीत बिघाडी होणार? नाना पटोलेंची बोलकी प्रतिक्रिया

    महापालिका निवडणुकांवेळी महाविकास आघाडीत बिघाडी होणार? नाना पटोलेंची बोलकी प्रतिक्रिया

    Maha Vikas Aghadi : महाराष्ट्राच्या राजकारणात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण विरोधी पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र? याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये राज्यातील प्रमुख शहरांच्या महापालिका निवडणुकांचादेखील समावेश असणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राज्यातील वातावरण तापायला लागलं आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. प्रत्येक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढता येईल का याची चाचपणी करत आहे. आगामी निवडणुका महायुतीत एकत्रितपणे लढवेल, असं स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांमध्ये एकीने निवडणुकीला सामोरं जाण्याबाबतच धोरण घेतलं जाण्याची शक्यता कमी आहे. कारण काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज विधान भवन परिसरात माध्यमांना प्रतिक्रिया देताना याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मतानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र आघाडीत लढायच्या की स्वतंत्र लढायच्या, याबाबत निर्णय होईल, असं नाना पटोले यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

    “स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मतानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या जातात. हे आजचंच नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात अशाप्रकारे निवडणुका लढल्या जात आहेत. त्यामुळे संजय राऊत काय बोलले यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा माझी प्रतिक्रिया हीच राहणार आहे की, स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोणत्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात आघाडी किती राहील या गोष्टी आजपासून कुणाला सांगता येणार नाहीत. त्यामुळे मी आज त्यावर प्रतिक्रिया देणे बरोबर नाही”, असं नाना पटोले म्हणाले.

    “सगळ्याच पक्षाने स्वबळाची तयारी केलेली आहे. त्या विषयावर आज चर्चा होऊ शकत नाही. ज्या वेळेस निवडणुका लागतील, स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारुनच याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच ठाकरे बंधू एकत्र आले तर आमचं हायकमांड निर्णय घेईल”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

    नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा

    दरम्यान, नाना पटोले यांनी आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या एका कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकावर निशाणा साधला. “शिवसेनेच्या आमदाराने कॅन्टीनमध्ये एका कामगाराला मारहाण केली. यामुळे फडणवीस सरकारचीच बदनामी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. पण प्रश्न असा आहे की, ही जी सर्व परिस्थिती आहे, आज महाराष्ट्रात जो गुंडाराज सत्तापक्षाकडून सुरु झालेला आहे, हे अशोभणीय आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही”, असं नाना पटोले म्हणाले.

    विधानभवन परिसरात नाना पटोले अन् राहुल नार्वेकर समोरासमोर आले, पुढं काय घडलं?

    “कायदा हातात घेण्याचा अधिकार आम्ही या लोकांना दिलेला नाही. ह्यांचे आमदार गणपती विसर्जणाच्या मिरवणुकीच्या वेळीदेखील गोळ्या झाडताना आम्ही पाहिलेले आहेत. महाराष्ट्रात चाललं काय, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये आपापसातलं गँगवार चालला आहे. एकनाथ शिंदे कशासाठी गेले आहेत, काय झालं ते मला इथे सांगता येणार नाही. या सरकारमध्ये गँगवार चालला आहे. त्या गँगवारची माहिती सांगायला एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असतील”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा