• Mon. Mar 9th, 2026

    धावत्या लोकलमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी, पोलिसाचं धाडस अन्…, कर्जत स्टेशनवरील घटना

    धावत्या लोकलमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी, पोलिसाचं धाडस अन्…, कर्जत स्टेशनवरील घटना

    कर्जत रेल्वे स्थानकावर धावत्या लोकल मधून एका महिलेने उडी मारली आणि एकच गोंधळ उडाला. तेथील पोलिसाच्या धाडस दाखवले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    अमुलकुमार जैन, रायगड : कर्जत रेल्वे स्थानकावर एका धावत्या लोकलमधून उडी मारणाऱ्या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी कर्जत रेल्वे पोलिस ठाण्यातील पोलीस जवानाने जीवाची बाजी लावली. वेळेवर घेतलेली ही धाडसी कृती आता सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

    दिनांक ५ जुलै रोजी सुनैना अखिलेश यादव (वय २५) व त्यांचे पती अखिलेश यादव (वय ३४), रा. शास्त्रीनगर, खोपोली हे दोघे कर्जत रेल्वे स्थानकावर आले होते. त्यांनी दुपारी ३.१५ वाजताची कर्जत–खोपोली लोकल पकडली. मात्र गाडी सुरू झाल्यानंतर अखिलेश यादव हे काही कारणास्तव प्लॅटफॉर्मवर उतरले आणि लोकल वेग पकडू लागली. पती गाडीत नाहीत हे लक्षात येताच सुनैना यादव यांनी कोणताही विचार न करता धावत्या लोकलमधून उडी मारली. ही घटना पाहून गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र मोतीलाल बागुल (हवालदार क्र. 875) यांनी प्रसंगावधान राखून व जीव धोक्यात घालून संबंधित महिलेची गाडीखाली जाण्यापूर्वीच प्लॅटफॉर्मवर खेचून तिचे प्राण वाचवले.

    दरम्यान, महिला जखमी झाली असून तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. याबाबत कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात जखमी नोंद क्र. 81/2025 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या पराक्रमी कृतीबद्दल महिलेने व तिच्या पतीने पोलीस हवालदार बागुल व कर्जत रेल्वे पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. या धाडसी कृतीसाठी कर्जत रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांनी देखील पो.हवा. बागुल यांचे अभिनंदन करत त्यांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे.

    रेल्वे पोलिसांकडून नेहमीच प्रवाशांनी ट्रेनमधून उतरताना आणि चढताना सर्तक राहण्याचे सांगितले जाते. ट्रेन सुटत असताना त्याच्या प्रवासी चढण्याचा प्रयत्न करतात अनेकदा रेल्वे पोलिस अथवा प्लॅटफॉर्मवरील प्रवासी जीव अशा प्रवाशांना वाचवतात. काही जण दुर्दैवाने जीव गमावतात. धावत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे हे जीवावर बेतू शकते असा इशारा दिला जातो. हा इशारा लोकल ट्रेनमधुन प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा