Issues with Chalo App: नागपूर महानगरपालिकेच्या ‘चलो ॲप’मुळे प्रवाशांची फसगत होत आहे. ॲपवर चुकीची माहिती उपलब्ध असल्याने, प्रत्यक्षात बस वेळेवर मिळत नाही. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून, नाइलाजाने जास्त पैसे देऊन असुरक्षित ऑटोरिक्षातून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने या त्रुटी सुधारून अधिक सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
शहर बसची तास न् तास वाट बघण्यापासून सुटका होण्यासाठी महापालिकेने ‘चलो ॲप’ सुरू केले. यावर शहर बस किती वेळाने येणार हे लाइव्ह दिसते. यामुळे प्रवाशांना नियोजन करणे सोयीचे जाते. बसचे तिकीट बुक करण्याची सुविधाही यावर देण्यात आली आहे. मनपाचा हा पुढाकार कौतुकास्पद आहे. मात्र, या ॲपच्या भरवशावर बसून अनेकांची फसगत झाल्याने त्यांना अधिक पैसे देऊन प्रवास करावा लागला आहे. महापालिकेकडे याबाबतची तक्रारही करण्यात आली आहे. मंगळवारी आम्हाला बसच उपलब्ध न झाल्याने एका खासगी कंपनीच्या बसद्वारे प्रवास करीत डिफेन्सला जावे लागले, असे नागरिकांनी सांगितले.
पुणे एसटीला उन्हाळी सुट्टी ‘पावली’; एप्रिल, मेमध्ये पाच कोटींहून अधिक नफा
‘डेटा’च चुकीचा
महापालिकेच्या ‘चलो ॲप’वर गेल्यानंतर प्रवास करणाऱ्याचे लाइव्ह लोकेशन हे ॲप ट्रॅक करते. ‘करंट लोकेशन’ ते प्रवाशाला कुठे जायचे आहे, ते ठिकाण यावर टाकल्यानंतर पुढील काही तासांत उपलब्ध असणाऱ्या बसेसची यादीच यावर दिसते. एका प्रवाशाने सीताबर्डीतील ‘आपली बस टर्मिनल ते दाभा’ असे सर्च केल्यानंतर रात्री ९ वाजता, त्यानंतर १० वाजता शहर बस उपलब्ध असल्याचे दिसत होते. यानुसार संबंधीत प्रवाशाने आपल्या पुढील प्रवासाचे नियोजन केले. मात्र, प्रत्यक्षात दाभ्याकडे जाणारी अखेरची शहर बस ही ७ वाजून ५० मिनिटांनी असल्याचे महापालिकेच्या शहर बस यंत्रणेकडून सांगण्यात आले. या यंत्रणेला ॲपमधील त्रुटींची माहिती देण्यात आली असता ‘आम्ही यात सुधारणा करू’, असे उत्तर या यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दिले. सीताबर्डीतून डिफेन्सकडे जाणारी बसही आली नसल्याने इतर प्रवाशांनीही ही व्यथा ‘मटा’कडे मांडली.
Bachhu Kadu | महाभारतातील अर्धवट राहिलेले नारायणाची भूमिका राणे करतायत, कडूंचा राणेंना टोला
ऑटोरिक्षांत कोंबून प्रवाशांची वाहतूक
शहर बसच्या या घोळामुळे नाइलाजास्तव प्रवाशांना ऑटोरिक्षाने प्रवास करावा लागतो. मात्र इथेही कुठलेच नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले. तीन प्रवाशांना बसविण्याची परवानगी असताना ७ ते ८ प्रवासी घेऊन ऑटोरिक्षा प्रवास करतात. यामुळे अपघाताचे धोके वाढले असून सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे दावे केले जातात. मात्र यात अनेक त्रुटी असून प्रशासनाने गांभीर्याने याकडे लक्ष देऊन अधिक सक्षम आणि सोईची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची मागणी होऊ लागली आहे.
