Prasad Lad : आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत धक्कादायक माहिती दिली की, त्यांच्या खोट्या लेटरहेडचा वापर करून, एआय तंत्रज्ञानाने आवाज काढत, रत्नागिरीतून बीडला 3 कोटी 20 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ओटीपी प्रणाली लागू करण्याची विनंती सरकारला केली आहे.
आता या नव्या प्रकरणाने कोकणातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या सगळ्याबाबत नावं कळलेली आहेत, कोण आहेत, ते जे कोणी असतील कोणत्याही पक्षाचे असतील, तरी त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी सभागृहात केली आहे.
‘श्रीकांत भारतीय यांच्या बाबतीतही हेच घडलं’
“माझी सरकारला विनंती आहे की हे माझ्या बाबतीत घडलं. याआधी श्रीकांत भारतीय यांच्या बाबतीतही हेच घडलं होतं. आणि हा विषय पंधरा-वीस लाख रुपयांचा असता तर समजलाही नसता. 3 कोटी 20 लाख रुपयांचा विषय आहे. हा विषय आपल्याला सगळ्यांनी गांभीर्याने घेतला पाहिजे. ही बाब गंभीर आहे. सरकारने याच्याबाबतीत आता नवीन टेक्नॉलॉजी ओटीपी सिस्टम आणावी. आमदारांकडून ओटीपी असेल आणि मग त्यानंतर निधी दिला जाईल, असं काहीतरी सिस्टम नवीन तंत्रज्ञान सरकारने आणावं”, अशी विनंती भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केली. पावसाळी अधिवेशनात पॉईंट ऑफ व्ह्यू इन्फॉर्मेशनद्वारे सभागृहात त्यांनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडत सरकारचे लक्ष वेधले.
प्रसाद लाड पुढे म्हणाले, आपले पीए असतील किंवा अन्य कोणी, याबाबतीत सरकारने पोलिसांना निर्देश द्यावेत, असं सांगत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात मांडला आणि सरकारचे लक्ष वेधून घेतलं आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेत शासनाने कारवाई करून ठोस अशा स्वरूपाचा धोरणात्मक निर्णय घ्यावा असे निर्देश दिले आहेत.

