• Wed. Mar 11th, 2026
    33 वर्षीय तरुणाची हत्या, धक्कादायक कारण समोर; जालन्यातून उचललं, विदर्भात नेलं अन्…

    Jalna Crime: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात 33 वर्षीय सुरेश अर्दाडचे अपहरण करून खून करण्यात आला. वाळू माफियांना सुरेश पोलिसांना माहिती देत असल्याचा संशय होता. आरोपींनी त्याचे अपहरण करून विदर्भात खून केला आणि मृतदेह तेथेच टाकून दिला. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.

    आई-वडील वारीला गेले अन् घरी अघडित घडलं; 33 वर्षीय तरुणाची हत्या, धक्कादायक कारण समोर (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    जालना: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुरेश अर्दाड नावाच्या 33 वर्षीय तरुणाचे अपहरण करून खून करण्यात आला. वाळू माफियांना सुरेश पोलिसांना माहिती देत असल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी हे कृत्य केले, असा पोलिसांचा अंदाज आहे.

    सुरेश अर्दाड यांचे गावातील लोकांशी चांगले संबंध होते. तो नेहमी पोलिसांसोबत उठबस करायचा. दोन दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाले. त्याच्या चुलत भावाने गावातील काही तरुणांना सोबत घेऊन त्याला कुंभारी पिंपळगाव येथे बोलावले. हरी कल्याण, सखाराम अर्दाड, हिनाज बाबामिया सय्यद या आरोपींनी सुरेशला बंदूक, कुऱ्हाड आणि चाकूचा धाक दाखवला आणि त्यांनी त्याचे अपहरण केले. त्याचा मृतदेह विदर्भात किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. आरोपींनी त्याचे अपहरण करून विदर्भात नेले आणि तिथे खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच टाकून दिला.

    पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घनसावंगी पोलिसांना कळवले. ती बॉडी सुरेश अर्दाडची असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बॉडी ताब्यात घेतली. सुरेशचे आणि त्याच्या चुलत भावाचे वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांशी खटके उडत होते. त्याचा चुलत भाऊ सुरेशला ‘तू पोलिसांचा खबरी आहे, आमची माहिती पोलिसांना देतो’ असे म्हणत होता. याच कारणामुळे त्याचा खून झाला असा पोलिसांना संशय आहे.

    Ashadhi Wari: वारकऱ्यांना कोयता दाखवत लुटलं, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पंढरपूरला जाताना दौंडमध्ये भीषण घटना

    सुरेशचे आई-वडील आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला दिंडीत सहभागी झाले होते. ते जवळपास गेवराई तालुक्यात पोहोचले होते. नातेवाईकांनी त्यांना फोन करून मुलाचे अपहरण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर ते तातडीने घराकडे परतले. त्यांना मुलाचे अपहरण झाल्याचेच सांगण्यात आले होते. घरी पोहोचल्यावर त्यांना सुरेशचा मृतदेह दिसला. हे पाहून कुटुंबाने एकच टाहो फोडला.

    दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे घनसावंगी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा