Cancellation Of Compulsory Hindi Language GR: मराठी -अमराठीमध्ये विषाचा खडा टाकण्याचा डाव संपला आता मराठी एकत्र येऊ नये, म्हणून हा दुसरा डाव टाकला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या आदेश सरकारने मागे घेतला, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.
हिंदी भाषा सक्तीविरोधात येत्या 5 जुलैला उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. मात्र, आता हा मोर्चा होणार नसल्याचं संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं. मात्र, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 5 जुलैला विजयी जल्लोषाचा मोर्चा किंवा सभा घेण्यात येईल.
सर्वात मोठी बातमी! हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
“भाजप ही अफवांची फॅक्टरी”
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर चांगलाच घणाघात केला. 5 जुलैला मराठी माणसं एकत्र येणार असल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, भाजपकडून खोटी माहिती पसरवली जात असून भाजप ही अफवांची फॅक्टरी असल्याचं ठाकरे म्हणाले. मराठी-अमराठी हे जे एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत, त्यात मुद्दाम विषाचा खडा हे टाकत आहेत. तो प्रयत्न फसल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून आता हा दुसरा डाव टाकला आहे. हे जे काय स्वयंघोषित अणाजीपंत आहेत, ज्यांना असं वाटतं की चाणक्यनंतर हेच, तर असं काही नाहीये, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
“मुख्यमंत्री हे मराठी भाषाविरोधी”
मुख्यमंत्री मराठी भाषेचे विरोधी का आहेत. मुख्यमंत्री हे मराठी भाषाविरोधी आहेत असा माझा आरोप आहे. इतकी जोरजबरदस्ती का केली जात आहे. इतरही विषय आहेत, तुम्ही त्यावर बोला, तुम्ही मराठीच्याच मागे का लागले आहात. मराठीबाबत तुमच्या मनात इतकं विष का आहे. मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या शत्रूंचे गुलाम आहेत का?, असं म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

