• Sun. Mar 8th, 2026

    ‘विरोधकांच्या पत्रात मराठी व्याकरणाच्या 24 चुका’, मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली

    ‘विरोधकांच्या पत्रात मराठी व्याकरणाच्या 24 चुका’, मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली

    Devendra Fadnavis : विधीमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. प्रथेनुसार, अधिवेशनच्या आदल्यादिवशी सरकारचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचं सरकारने विरोधकांना निमंत्रण दिलं होतं. पण ते निमंत्रण विरोधकांनी नाकारलं. विरोधकांनी सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. विरोधकांनी सरकारला पत्र पाठवत याबाबत माहिती दिली. पण या पत्रात मराठी व्याकरणाच्या 24 चुका आढळल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : राज्यात शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विधीमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावर नेहमीनुसार विरोधकांनी बहिष्कार टाकला. या चहापानाच्या कार्यक्रमानंतर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या पत्रात मराठी व्याकरणाच्या 24 चुका असल्याचं सांगत खिल्ली उडवली.

    “महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. महायुती सरकारचं हे चौथं अधिवेशन आहे. सध्या राज्यभर पाऊस पडतोय. बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी आहे. काही ठिकाणी अजूनही हवा तसा पाऊस नाही. पण बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडतोय. पेरण्या चांगल्या प्रमाणात होत आहेत. बियाणी, खते योग्य प्रमाणात उपलब्ध व्हावेत यासाठी राज्याची यंत्रणा काम करत आहे. खतांबाबत काही जिल्ह्यातून तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत काम सुरु आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातीला म्हणाले.

    “अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही विरोधकांना चहापानाचं निमंत्रण दिलं होतं. पण नेहमीच्याच पद्धतीने विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे. हा बहिष्कार टाकत असताना त्यांनी भलंमोठं पत्र आम्हाला दिलं आहे. पत्र मोठं असलं तरी मजकूर मोठा नाहीय. मागच्या पत्रातील मुद्देच असून मोठा फाँट दिला आहे. फक्त एक-दोन मुद्दे त्यांनी वाढवले आहेत”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

    “मराठीचा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे मी त्यांच्या निदर्शनास आणून देतो की, त्यांच्या पत्रात 24 चुका आहेत. पण काही हरकत नाही, बॉम्बे स्कॉटीशमध्ये शिकल्यावर अशी परिस्थिती येते”, असादेखील टोला देवेंद्र फडणीस यांनी लगावला. तसेच “आज मविआच्या पत्रकार परिषदेला भास्कर जाधव दिसले नाहीत. मागच्या पत्रकात भास्कर जाधव यांची सही होती. आज सहीदेखील दिसत नाही”, असा चिमटा फडणवीसांनी काढला.

    “तशा आजच्या सह्या पाहिल्या तर ठाकरेंच्या पक्षाच्या 5, काँग्रेसच्या 3, शरद पवारांच्या पक्षाच्या 2 सह्या आहेत. आज विजय वडेट्टीवार पत्रकार परिषदेत म्हणाले, आमच्या कामांना स्थगिती दिली. वडेट्टीवारांना अजूनही उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत, असं वाटतंय. पण त्याहीपेक्षा आज जितेंद्र आव्हाडांनी आज बोफोर्सची आठवण काढली. बोफर्सचा घोटाळा झाला होता ते जितेंद्र आव्हाड यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांनी घरचा आहेर दिला आहे. विरोधकांच्या पत्रात कुठलीही कल्पकता, नवा विषय दिसला नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा