Accident News: राहुरी येथे नगर-मनमाड महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात सुचिता आधाटे या पीएचडी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नाच्या अवघ्या पंधरा दिवसांतच ही हृदयद्रावक घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
सुचिता आधाटे कृषी विस्तार शिक्षण विषयात पीएचडी करत होत्या. त्यांचे शिक्षण दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात झाले. त्यांनी बीएससी आणि एमएससी पर्यंतचे शिक्षण तिथेच पूर्ण केले. त्यानंतर त्या राहुरी कृषी विद्यापीठात पीएचडीसाठी (PhD) दाखल झाल्या. त्या त्यांच्या रिसर्च पेपर लवकरच प्रकाशित करणार होत्या. पण दुर्दैवाने त्यांच्यासोबत हा अपघात झाला.
सुचिता आधाटे या मूळच्या पुणे येथील होत्या. त्या कृषी विस्तार विभागात पीएचडीच्या (PhD) शेवटच्या वर्षात शिकत होत्या. 8 जून रोजी त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर त्या पुन्हा राहुरीला हॉस्टेलवर राहून शिक्षण घेत होत्या. 27 जून रोजी दुपारी 1 च्या सुमारास त्या दुचाकीवरून पेट्रोल पंपावर (petrol pump) पेट्रोल भरण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी नगरकडून राहुरीकडे येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
कोल्हापुरात ठाकरेसेनेत वाद उफाळला, खंजीर खुपसणाऱ्यासोबत काम करणार नाही; शहरप्रमुखाची भूमिका
या अपघातात सुचिता यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यामुळे त्या जागीच बेशुद्ध झाल्या. अपघाताची माहिती मिळताच विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत डी. एन. जाधव, जयेश पवार, अमोल दिवे, गणेश पर्वत, अनिल नजन, रविराज काळे आणि महिला सुरक्षा रक्षक पूजा पवार, वर्षा नेहे हे देखील होते.
सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सुचिता यांची गंभीर अवस्था पाहून त्यांना तातडीने शासकीय वाहनातून अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलवले. त्यांच्यासोबत महिला सुरक्षा कर्मचार देखील होत्या. परंतु, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अपघातग्रस्त वाहने आणि कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. या घटनेसंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
सुचिता यांच्या अपघाताची बातमी कळताच, दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांनी दुःख व्यक्त केले. कोकण कृषी विद्यापीठातील निवृत्त शिक्षण संचालक प्रा. डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “एक अत्यंत हुशार असलेली विद्यार्थिनी अकाली गेल्याने दुःख झाले”. या दुर्घटनेमुळे सुचिता यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे अकाली जाणे सर्वांना चटका लावणारे आहे.

