आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्ष ताकदीने उतरणार असून, महायुतीसोबत योग्य मार्ग न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे. आमदार विनय कोरे यांनी विविध विकासकामांवर भाष्य करताना, शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार आणि विरोधक यांच्यात चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले.
‘राज ठाकरे यांची भूमिका अशा पद्धतीने येणं स्वाभाविक’
कोल्हापूरतील वारणानगर इथं UPSC परीक्षेत महाराष्ट्रातून यश संपादीत केलेल्या यशवंताचा सत्कार करण्यात आला. वारणानगरमधील सुराज्य फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांच्या हस्ते UPSC परीक्षेत यश संपादीत केलेल्या यशवंताचा सत्कार करण्यात आला. यंदा महाराष्ट्रातून 80 हुन अधिक विद्यार्थ्यांनी UPSC परीक्षेत यश संपदान केले होते. त्यापैकी 20 हुन अधिक विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आजच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित होते. यावेळी हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही नवीन नाही. राजकारणात राजकारणासाठी वेगवेगळे मुद्दे वापरले जातात. राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी पाट्यांसाठी अनेक वर्ष काम केलेलं आहे. मराठी भाषकांना एकत्र आणण्याच त्यांच काम सुरू असताना, हिंदी सक्ती बाबतचा मुद्दा समोर आला आणि यावर राज ठाकरे यांची भूमिका अशा पद्धतीने येणं हे स्वाभाविक आहे, असं आमदार विनय कोरे म्हणाले.
राज्यात कोणती भाषा शिकावं अथवा शिकू नये यापेक्षा आपण मराठी भाषिक म्हणून एकत्र असायला हवं, अस मला वाटतं. त्रिभाषा सूत्र यापेक्षा या पूर्वी संपूर्ण राष्ट्र म्हणून एकत्र राहत असताना एक भाषा असावी यासाठी हिंदी फिल्मसृष्टीला मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचा प्रयत्न देखील झाला. हे सर्व या आधीपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांवर फार काही परिणाम होतील, असं मला वाटत नाही, असं आमदार कोरे म्हणाले आहेत.
‘काही जणांना राजकारणासाठी मुद्दा हवा असतो’
“राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेला शक्तिपीठ महामार्गावरून शेतकरी आणि सरकार आमने-सामने आले आहेत. येत्या 1 जुलैला 12 जिल्ह्यांत महामार्ग रोखत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे यासंदर्भात देखील बोलताना आमदार विनय कोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शक्तीपीठ महामार्ग संदर्भात दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. शक्तीपीठ महामार्ग झाला तर त्याचे काय फायदे होऊ शकतात आणि शक्तीपीठ महामार्गात शेतकऱ्यांची जमीन गेली तर काय होणार? शेतकऱ्यांना याची गरज आहे का? अशा वेगवेगळ्या भूमिका आहेत. यासंदर्भात प्रत्यक्ष दोन्ही बाजूने चर्चा होईल”, असं आमदार विनय कोरे म्हणाले.
“समृद्धी महामार्ग संदर्भात जेव्हा चांगल अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलं त्यावेळी ते सर्व जमिनी देण्यास तयार झाले. रत्नागिरी-नागपूर महामार्गला देखील अतिशय चांगलं अनुदान दिल्याने शेतकरी खुश आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले. शक्तिपीठ महामार्गासाठी काही शेतकरी शेती घ्या म्हणत आहेत. मात्र काही जणांना राजकारणासाठी मुद्दा हवा असतो. जेव्हा प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी सरकार आणि विरोधी शेतकरी यांना एकत्र बसवून काही पर्याय निघतो का? हे पहावं लागेल”, असेही आमदार विनय कोरे म्हणाले आहेत.

