BJP News: महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून राजकारण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा केली आहे. अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी हा मोर्चा होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपने या मोर्चाला उत्तर देण्यासाठी नवी रणनीती आखली आहे.
भाजपने मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार केला असून भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबतची रणनीती ठरवण्यात आली आहे. मराठी-हिंदीवरुन सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा मुद्दा पुढे करुन शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला, ही गोष्ट भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार, याचे महत्त्व भाजप लोकांमध्ये जाऊन सांगणार आहे.
दरम्यान, भाजपचा हा प्रयत्न हिंदी सक्तीवरून उभे राहत असलेल्या ठाकरे बंधूंच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी पुरेसा ठरतो का, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.
संजय राऊतांकडून मोठी घोषणा
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर केला असून राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात हे दोघे एकत्र मोर्चा काढणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. राऊत म्हणाले, “महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल”. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा होती. आता संजय राऊत यांच्या घोषणेमुळे अखेर ही चर्चा प्रत्यक्षात उतरत असल्याचं दिसत आहे.

