Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुचाकी वाहनधारकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. दुचाकी वाहनांना टोल लागणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात होत्या. यावर गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
15 जुलैपासून दुचाकी वाहनांना टोल लागेल, अशी चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत होती. या चर्चांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही वाहतूक संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली आणि सरकारला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. यावर नितीन गडकरी यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, सरकार दुचाकी वाहनांवर टोल लावण्याचा विचार करत नाही.
नितीन गडकरी म्हणाले, “काही मीडिया संस्था दुचाकी वाहनांवर टोल लावण्यासंबंधी चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. याबद्दल कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही. दुचाकी वाहनांना टोलमधून दिलेली सूट कायम राहील. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, अशा बातम्या पसरवू नयेत,” असं आवाहन गडकरी यांनी केलं आहे.
सध्या देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल लागत नाही. हा नियम यापुढेही कायम राहील. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्याचवेळी अॅक्सेस कंट्रोल्ड हायवे आणि एक्सप्रेसवे यांसारख्या रस्त्यांवर दुचाकी वाहनांना प्रवेश करण्याची परवानगी नाही. अशा रस्त्यांवर दुचाकी चालवणे कायद्याचे उल्लंघन आहे, हेदेखील अधोरेखित करण्यात आलं आहे.
दरम्यान, टोलबाबत नितीन गडकरी यांच्या स्पष्टीकरणामुळे आता दुचाकी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या धोरणात कोणताही बदल होणार नाही, हे निश्चित झाले असून टोलच्या नावाखाली उगाचंच निर्माण होणारी धास्ती आता दूर होण्यात मदत होणार आहे.

