Jalgaon Crime News : भुसावळमधील एका हॉटेलमध्ये 10-12 टवाळखोरांनी व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला, ज्यात व्यवस्थापकाला गंभीर दुखापत झाली. दारू देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी हॉटेलमध्ये तोडफोड देखील केली. घटनेनंतर तीन दिवस उलटूनही पोलीस आरोपींना पकडण्यात अपयशी ठरले आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील काही टवाळखोरांनी चेहऱ्याला रुमाल बांधल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.
फक्त एकदाच नाही तर दोनवेळा या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांचे सीसीटीव्ही फुटेजदेखील बाहेर आले आहेत. तरीदेखील पोलिसांकडून समाधानकारक कारवाई करण्यात आली नाही. टवाळखोर इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ला करतात, याचा अर्थ गुन्हेगारांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही, असं चित्र दिसत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल आता तरी पोलिसांकडून घेतली जाईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
नेमकं काय घडलं?
जळगावच्या भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील वरुण हॉटेलमध्ये व्यवस्थापकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दारूची बाटली देण्यास नकार दिल्याच्या रागातून 10 ते 12 जणांनी हॉटेल व्यवस्थापकावर जीवघेणा हल्ला केला. हॉटेल व्यवस्थापकावर 10 ते 12 जण जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुमित सुभाष इंगळे असे 33 वर्षीय हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर 26 टाके पडले आहेत, तर हॉटेलमधील वेटर आणि स्वयंपाकी सुद्धा घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेत सलग दोन दिवस टवाळखोरांनी हॉटेलचे व्यवस्थापकाला तसेच हॉटेलमधील शेप आणि वेटरला सुद्धा मारहाण केल्याचं हॉटेल मालक वरून पाटील यांच म्हणणं आहे. टवाळखोरांनी डोक्यात काचेची बाटली, चाकू, काठी मारून जखमी केले. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता हॉटेलमध्ये तोडफोड सुद्धा केली.
जळगावात ‘आज का गुंडाराज’? हॉटेलमध्ये टोळक्याचा हल्ला, 10 ते 12 जणांकडून अमानुषपणे मारहाण
याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे तीन दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. दरम्यान, टवाळखोरांनी अशा पद्धतीने हॉटेलमध्ये जीवघेणा हल्ला करत तोडफोड केल्याच्या घटनेमुळे पोलिसांचा धाक संपला का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

