NCP Ajit Pawar News: पुरंदर विमानतळाच्या जागेसाठी शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. शरद पवारांनी या प्रकरणी लक्ष घालून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी बागायती क्षेत्र वाचवण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील सलोखा पुन्हा एकदा दिसून आला.
शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये असल्याने त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. फडणवीस यांच्याशी बोलणं झालं नसल्याने शरद पवार यांनी थेट पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला आणि या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास सांगितलं. ‘पुरंदर विमानतळासंदर्भात शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात तुम्ही एक बैठक लावा आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावा’, असं शरद पवार हे अजित पवार यांना म्हणाले आहेत.
अजित पवारांच्या फोननंतर काय म्हणाले शरद पवार?
“केंद्र सरकारने पुण्यासाठी एक विमानतळ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी पुरंदरची निवड केली आहे. त्यांनी पुरंदर विमानतळासाठी जी गावं निवडली त्यामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता असताना मी सिंचनाची एक स्कीम राबवली आणि त्यामुळे हा भाग बागायत झाला. त्या भागामध्ये विशेषतः ऊस आणि फळबागाचा क्षेत्र वाढलं आहे. त्यामुळे सहाजिकच स्थानिक लोकांच म्हणणं आहे आम्ही कष्टाने ही शेती सुधारवली, त्यामुळे या प्रकल्पातून आमची सुटका करा. याबद्दल त्यांनी काल सविस्तर आमच्यासमोर सांगितले. मी आता याचा असा विचार करतोय की निर्णय शेवटी केंद्र सरकार घेणार आहे. एमआयडीसीला जागेसंदर्भात भूमिका घेण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे याचा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक लोक या तिघांशी बोलावं लागेल. यामध्ये माझा प्रयत्न असा असणार आहे की, तिथल्या स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि बाकीच्या भागातील प्रमुख कार्यकर्ते यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलवावी आणि याच्यातून काय मार्ग काढता येतोय, विशेषतः जे बागायत क्षेत्र आहे ते वाचवता येईल का, याचा एक आढावा घेतला जाईल. त्यानंतरच नेमकी परिस्थिती सांगता येईल,” अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे.
काका-पुतण्यातला अबोला मिटला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षातील बहुसंख्य नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षही अजित पवारांना मिळाला होता. अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामधील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये होत असलेली जवळीक दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये काका-पुतणे आता एकाच मंचावर पाहायला मिळतात. इतकंच नाही तर आत्तापर्यंत दोघांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमात असणारा अबोला देखील आता मिटला आहे. त्यामुळे पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा काका-पुतण्यामध्ये असणारं ट्युनिंग दिसून आलं आहे.

