मुंबई-प्रतिनिधी
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ते राजकारणातही सक्रिय आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांना एका अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारणे दाखवा नोटीस धाडल्याने ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मालाडच्या मढ भागातील एरंगल गावातील एका अनधिकृत तळमजल्याच्या बांधकामासंदर्भात BMC ने त्यांना ही नोटीस बजावली आहे.फ्री प्रेस जर्नलमधील वृत्तानुसार, मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 351(1 ए) अंतर्गत बजावण्यात आलेल्या या नोटीसमध्ये चक्रवर्ती यांना सात दिवसांच्या आत बांधकामासंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले होते. 10 मे रोजी ही नोटीस जारी करण्यात आली होती. अभिनेत्याला देण्यात आलेल्या या 7 दिवसाच्या मुदतीमध्ये हे बांधकाम कायदेशीर असल्याचे पुरावे त्यांनी सादर करणे आवश्यक होते. जर समाधानकारक स्पष्टीकरण दिले गेले नाही तर, BMC कडून हे बांधकाम पाडले जाण्याची शक्यता आहे आणि कायदेशीर कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.मिथुन चक्रवर्ती यांनी फेटाळले आरोप
आरोपांना उत्तर देताना मिथुन चक्रवर्ती यांनी BMC कडून करण्यात आलेल्या दाव्यांचे खंडन केले. पोर्टलने जे त्यांचे निवेदन दिले आहे, त्यात अभिनेत्याने असे म्हटले की, ‘माझ्याकडे कोणतेही अनधिकृत बांधकाम नाही. अनेकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत आणि आम्ही आमची उत्तरे पाठवत आहोत.’101 अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाईमढ भागातील बेकायदेशीर बांधकामांवर बीएमसीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले. अधिकाऱ्यांनी या परिसरातील 101 अनधिकृत बांधकामे ओळखली आहेत, ज्यात बनावट कागदपत्रांचा वापर करून बांधलेले बंगलेदेखील समाविष्ट आहेत. मे महिन्याच्या अखेरीस अशा सर्व बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे महानगरपालिकेने लक्ष्य आहे. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांच्या घरावर बुलडोझर चालणार की काय, असा सवाल उपस्थित होतो आहे.मीडिया रिपोर्टनुसार, बीएमसीच्या सूत्रांनी अशी माहिती दिली की, हिरा देवी मंदिराजवळील अलिकडेच केलेल्या तपासणीत असे आढळून आले की दोन एक मजली इमारती, एक तळमजला आणि तीन तात्पुरते युनिट्स विटा, लाकूड, काच आणि एसी शीटपासून बनवलेले होते. संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य परवानगी न घेता या इमारती बांधण्यात आल्याचे वृत्त आहे.
