केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच परळी येथे शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही तरूणांनी मिळून ही मारहाण केली. शिवराज दिवटे असे या तरुणाचे नाव आहे. एका टोळक्याने त्याचे अगोदर अपहरण केले आणि त्याला रत्नेश्वर डोंगरावर नेऊन बांबू आणि लाकडाने मारहाण केली.सध्या शिवराज दिवटे याच्यावर उपचार सुरू असून त्याची तब्येत स्थिर आहे. या बेदम मारहाणीबद्दल बोलताना शिवराज दिवटे हा म्हणाला की, काही लोक मदतीला धावून आल्यानेच मी जिवंत राहू शकलो, अन्यथा त्यांनी मला जिवंत सोडले नसते. यासोबतच शिवराज दिवटे याने धक्कादायक खुलासा देखील केलाय. मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करू असे म्हणत होते, असेही शिवराज दिवटेने म्हटले.
पेट्रोल पंपासमोरुन तरुणाचं अपहरण, मग निर्घृण मारहाण, धक्कादायक व्हिडीओ समोरशिवराज दिवटे म्हणाला की, मी माझ्या मित्रांसोबत अखंड हरिनाम सप्ताहाला गेलो होतो. त्याठिकाणी काही लोकांचे भांडण झाले होते. मला त्या संदर्भात माहिती नाही. परंतु त्यानंतर मी गावी परतत असताना आमच्या दुचाकीला चार ते पाच जणांनी अडवले आणि मला दुसऱ्या दुचाकीवर बसून रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन गेले. त्या ठिकाणी मला लाट्या काठ्यांनी मारहाण केली. मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करू असं म्हणत होते.काही लोक माझ्या मदतीला आले. मला त्यांच्या तावडीतून सोडवले नसता त्या पोरांनी मला जिवंत सोडले नसते. त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी असे म्हणत शिवराज दिवटे याने घडलेला प्रसंग सांगितला. दरम्यान आता जखमी असलेल्या शिवराज याची भेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी देखील घेतली असून त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून यावर ठोस पावले उचलत यातील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. घडलं शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून जखमी शिवराज याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यानच आता पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या घटनेला जातीय रंग देऊ नये, असे आवाहन केले आहे. मागील काही दिवसांपासून बीड जिल्हात जातीयवाद वाढल्याचे बघायला मिळत होते.