• Sun. Jun 7th, 2026
    राज ठाकरेंकडून उद्धव यांच्या अटींना केराची टोपली; ‘त्या’ गाठीभेटींमुळे फिस्कटणार युती?

    Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंना जोरदार धक्का बसला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ २० जागांवर विजय मिळाल्या. तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भोपळाही फोडता आला नाही.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंना जोरदार धक्का बसला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ २० जागांवर विजय मिळाल्या. तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर दोन्ही ठाकरेंसाठी अस्तित्त्वाची लढाई सुरु झाली. गेल्याच महिन्यात दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला. राज आणि उद्धव यांनी सूचक विधानं करत मनोमिलनाचे संकेत दिले. त्यानंतर दोन्ही बंधू परदेशी निघून गेले आणि ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा थंडावली. पण आता राज यांच्या सुरु असलेल्या भेटीगाठी पाहात युती होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. उद्धव यांच्या अटींना राज यांनी केराची टोपली दाखवल्याचं दिसत आहे.

    ‘महाराष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी आमची भांडणं, वाद अतिशय क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय केवळ इच्छेचा आहे. माझ्या एकट्याचा इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे,’ असं राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबतच्या यु्तीच्या चर्चेवर म्हणाले होते. राज यांची मुलाखत सकाळी प्रसिद्ध झाली. त्यानंतर लगेच काही तासांनीच उद्धव यांनी एका जाहीर भाषणातून त्यांना प्रतिसाद दिला.
    Cabinet Meeting: मोठी बातमी- राज्यात कृत्रिम वाळू धोरणाला मंजुरी, ITIबाबतही महत्त्वाचे पाऊल; मंत्रिमंडळ बैठकीत ६ निर्णय
    ‘मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं अतिशय किरकोळ आहे. ती बाजूला ठेवायला मी तयार आहे. मीदेखील सर्व मराठी माणसांना मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो,’ असं उद्धव ठाकरे भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात म्हणाले. राज यांना युतीसाठी साद घेतलेली असताना त्यांना प्रतिसाद देताना उद्धव यांनी त्यांच्यासमोर एक ठेवली.

    ‘जेव्हा आम्ही लोकसभा निवडणुकीवेळी सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातला उद्योगधंदे घेऊन जात आहेत, तेव्हाच जर तुम्ही विरोध केला असता, तर हे सरकार आलं नसतं. आज महाराष्ट्राच्या हिताचं सरकार केंद्रात बसवलं असतं आणि राज्यातही महाराष्ट्राच्या हिताचं सरकार बसवलं असतं. त्याचवेळी काळे कायदे केराच्या टोपलीत गेले असते. तेव्हा पाठिंबा द्यायचा आणि आता विरोध करायचा आणि परत तडजोड करायची असं नाही. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत करणार नाही. त्याला मी बोलावणार नाही. त्याच्या घरी मी जाणार नाही. त्याचं आगत स्वागत करणार नाही. पंगतीला बसवणार नाही, हे आधी ठरवा. मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

    Raj Thackeray: राज ठाकरेंकडून उद्धव यांच्या अटींना केराची टोपली; ‘त्या’ गाठीभेटींमुळे फिस्कटणार युती?

    माझ्यासोबत युती करायची असेल तर महायुतीच्या नेत्यांना भेटू नका, त्यांचं आगतस्वागत करु नका, अशी स्पष्ट अट उद्धव यांनी राज यांच्यासमोर ठेवली होती. पण राज यांनी त्यांच्या अटीला केराची टोपली दाखवल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज यांची तीनच दिवसांपूर्वी भेट झालेली आहे. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू उदय सामंत शिवतीर्थावर राज यांच्या भेटीसाठी पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. त्यामुळे राज यांच्या महायुतीच्या नेत्यांसोबत भेटीगाठी सुरुच आहेत. उद्धव यांनी युतीसाठी घातलेल्या अटीला राज यांनी महिन्याभरातच केराची टोपली दाखवल्याचं स्पष्ट दिसत आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed