• Sat. Mar 7th, 2026
    ‘मिरा-भाईंदर ते दहिसर’ मेट्रो लवकरच सुरू, एमएमआरडीएकडून चाचणी होणार; कसा असेल मार्ग?

    Mira Bhayander to Dahisar Metro : मिरा-भाईंदरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मिरा-भाईंदर ते दहिसर मेट्रोची चाचणी लवकरच सुरू होणार असून, एमएमआरडीएने तयारी पूर्ण केली आहे. डिसेंबर अखेरीस दहिसर ते काशिगावपर्यंतचा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चाचणी पार पडणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरकरांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा लागलेल्या ‘मिरा-भाईंदर ते दहिसर’ मेट्रोची चाचणी एमएमआरडीएकडून लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली तयारी नुकतीच पूर्ण झाली असल्याचे समजते. ही चाचणी पुढील काही महिने चालणार असल्याने डिसेंबरअखेरीस दहिसर ते काशिगावपर्यंतचा मेट्रोचा पहिला टप्पा नागरिकांच्या सेवेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    मिरा-भाईंदरकरांना लगत असणाऱ्या मुंबईत रेल्वेने जायचे झाल्यास वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे गर्दीचा तर, रस्तेमागें वाहतूककोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. यातून दिलासा देण्याच्या दृष्टीने मेट्रो मार्गिका उभारून ती मुंबईशी जोडण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारकडून ‘मिरा-भाईंदर ते दहिसर मेट्रो ९’ प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.
    Metro in Mumbai : बीकेसी ते वरळी नाका, गायमुख-ठाणे ते वडाळा, दहिसर ते भाईंदर, ते अंधेरी; चहुदिशांना मेट्रो, कुठून ते कुठे, कशी असणार स्थानकं?
    तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मेट्रोचे काम प्रगतिपथावर आले आहे. या प्रकल्पाचे दहिसर ते काशिगावपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे ९७ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.

    मेट्रो रूळ अंथरण्यात आले असून विद्युतवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्याच्या तपासणीचे काम गेल्या काही दिवसांपासून केले जात जाते. तेही नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रोची चाचणी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच हे काम एमएमआरडीएकडून हाती घेतले जाणार आहे.
    Mumbai Metro 3 : दीड तासाचा प्रवास आता १५ मिनिटांवर, भुयारी मेट्रो ३ सिद्धिविनायक मंदिरामार्गे मुंबईत; काय आहेत तिकीट दर?
    ही चाचणी घेण्यासाठी सुमारे पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर अंतिम चाचणी रेल्वे सुरक्षा बोर्डाकडून घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यांची अंतिम परवानगी मिळाल्यावर सेवा सुरू करता येणार आहे. यासाठी डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मिरा-भाईंदरकरांना पुढे दहिसर स्थानकातून मेट्रो बदलून अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवास करत येणार आहे. तर, दहिसर-आनंद नगर मेट्रो स्थानकाची अंतर्गत जोडणी झाल्यानंतर दहिसर स्थानकातून अंधेरी पश्चिम (ओशिवरा) मार्गावर प्रवास करणे शक्य होणार आहे.

    Mira Bhayander Metro : ‘मिरा-भाईंदर ते दहिसर’ मेट्रो लवकरच सुरू, एमएमआरडीएकडून चाचणी होणार; कसा असेल मार्ग?

    दुसऱ्या टप्प्यासाठी डिसेंबर २०२६ उजाडणार –

    मिरा-भाईंदर मेट्रोचे काम दहिसर ते काशिगाव आणि काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान अशा दोन टप्प्यांत केले जात आहे. पहिल्या टप्याचे काम पूर्णत्वास आले असले तरी दुसऱ्या टप्प्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्यातील सेवा सुरू होण्यासाठी डिसेंबर २०२६ उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    फडणवीस-शिंदे यांची उपस्थिती

    मिरा-भाईंदर ते दहिसर मेट्रोची चाचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी त्यांच्याकडे चालू आठवड्याची वेळ मागण्यात आली आहे. त्यांच्याकडून वेळ प्राप्त झाल्यावर चाचणीची तारीख जाहीर केली जाणार आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed