• Sat. Mar 7th, 2026
    महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा ४० जागांवर लढण्याचा निर्धार; महायुतीत पेच?

    NCP to contest on 40 Seats of Nagpur Corporation : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमधील सर्वात मोठा अडथळा सर्वोच्च न्यायालयाने दूर केला आहे. चार महिन्यांत निवडणुका पार पडणार आहेत. यामुळे नागपूर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. शहरात राष्ट्रवादी पक्षाने ४० जागांवर निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.

    (फोटो– Lipi)

    जितेंद्र खापरे, नागपूर : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमधील सर्वात मोठा अडथळा सर्वोच्च न्यायालयाने दूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महानगरपालिका निवडणुका येत्या चार महिन्यांत पार पडणार आहेत. यामुळे नागपूर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात पक्षाने ४० जागांवर निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.

    राष्ट्रवादी पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत प्रभागनिहाय पक्षाची ताकद, संभाव्य उमेदवार आणि विजयाची शक्यता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेत एकमताने ४० जागांवर निवडणूक लढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
    Maharashtra Politics : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेला जोर! मात्र गोची कुणाची?
    राष्ट्रवादी काँग्रेस सध्या शहरात सदस्यता मोहीम राबवत आहे. पक्षाच्या संघटनेत लक्षणीय वाढ होत आहे. याआधी काँग्रेससोबत असताना राष्ट्रवादीने समंजस भूमिका घेतली होती, मात्र सध्या महायुतीमध्ये असताना देखील पक्षाला न्याय मिळत नसल्याचा सूर स्थानिक नेतृत्वातून उमटत आहे. नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षानंतर सर्वाधिक आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याचा दावा करत केवळ २-३ जागांची मागणी हा अन्यायकारक निर्णय ठरेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी व्यक्त केला आहे.

    हा ठराव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विदर्भाचे संपर्क नेते राजू जैन यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

    गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारात पक्ष कार्यकर्ते आघाडीवर होते. मात्र, त्यानंतरही स्थानिक पातळीवर पक्षाला महत्त्व न दिल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे नागपूर महापालिका निवडणुकीत महायुतीतील समन्वयाच्या बाबतीत मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed