Udayanraje Bhosale on India Pakistan Tension : सोलापुरात बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य केले. फाळणी का झाली यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीमेवर जवान शहीद होत आहेत, याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. दहशतवादी कसे निर्माण झाले, यावर विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. हिंदू-मुस्लिम सलोख्याबद्दल त्यांनी विचार व्यक्त केले. सध्या जे सुरु आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होते का? असा सवालही त्यांनी केला.
“एक-एक वेळेस डोकं काम करायचं बंद होतं. बॉर्डरवर कोण असेल आपल्या कुटुंबातील कोण गेलं तर कसं वाटेल? जगात कोणीही असू द्या थोडं शांत बसून, आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे की इथं काय, आपण काय करतोय? याचे उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे”, असं उदयनराजे म्हणाले. “हे डोंगर जेवढे दिसत आहेत ना ते तुम्ही आम्ही निर्माण केलेले नाही. हे पहिल्यापासून आहेत. हा निसर्ग आहे. निसर्ग पेक्षा कोणी मोठे नाही. आज मला सांगा त्यावरून वाद? कमाल आहे”, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केलीय.
“दहशतवादी कसे निर्माण झाले, का निर्माण झाले, तुम्ही पत्रकार आहात तुम्ही विचार करा, का निर्माण झाले? ज्याला दोन टाईम जेवण मिळत नसेल तो काय करणार? त्याला कुटुंबाची काळजी घेत असताना त्यांची मुलं जर उपाशी राहत असतील तर काय करणार?”, असं उदयनराजे म्हणाले.
“हिंदू-मुस्लिम हे ते, सर्वांना उदंड आयुष्य लाभो, पण चुकून काय झालं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात, तसं कोणी जाऊ नये, पण त्या वेळेस तुम्ही काय विचार करत नाही की, तुझा ब्लड ग्रुप काय ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह. जे चाललंय ते कोणालाही मान्य नाही, काही लोकांना मान्य असेल. मी त्या कुटुंबातील घटक आहे म्हणून बोलत नाही. पण मला तर अजिबात चालत नाही. ते बघून मला मानसिक त्रास होतो. छत्रपती शिवाजी महाराजांना हे अभिप्रेत होतं का? होतं का?”, असे सवाल उदयनराजे भोसले यांनी केले.
