Sharad Pawar Marathi News : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कामगिरीनंतर, पाकिस्तानने आगळीक करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय लष्कराने तो हाणून पाडला. यानंतर, सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी या ऑपरेशनची माहिती दिली. या निमित्ताने शरद पवारांनी संरक्षण मंत्री असताना महिलांना सैन्यात भरती करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची आठवण करून दिली, ज्यामुळे आज महिला सक्षमपणे देशाचे संरक्षण करत आहेत.
आपल्या सैन्यदलाची कामगिरी पाहून अभिमान वाटतो. विशेषतः आता सैन्यदल केवळ पुरुषांच्या नव्हे तर महिलांच्याही हाती आहे, त्यांचं कर्तुत्व आज आपल्याला बघायला मिळत आहे हे पाहून आनंद होतो. मला आठवतं, संरक्षण मंत्री असताना दर सोमवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयात एक बैठक होत असे. त्या बैठकीत आर्मी, नेव्ही, एअर फोर्सचे प्रमुख, परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव सहभागी होत. मी एकदा सुचवलं की लष्करात महिलांनाही संधी दिली पाहिजे. तीनही दलांचे प्रमुख म्हणाले की हे शक्य नाही. मी त्यांना विचार करण्यास सांगितलं. पुढील तीन बैठकांनंतरही त्यांनी नकार दिला, आणि चौथ्या बैठकीत मी स्पष्टपणे सांगितलं की देशाच्या संरक्षणविषयक निर्णय घेण्याचा अधिकार जनतेने मला दिला आहे. त्यामुळे इथून पुढे भारताच्या सैन्यात किमान नऊ टक्के महिला असतील आणि त्यांना संधी दिली जाईल, असं शरद पवार यांनी सांगितलं.
गगनयान मोहिमेच्या ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन यांना परत बोलावलं, India-Pakistan Tension दरम्यान मोठा निर्णय
आज आपण पाहतो की पाकिस्तानच्या सीमेवर घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण करणाऱ्या दोन महिला आहेत, त्यातील एक बेळगावमधील आणि मुस्लिम समाजातील आहे. याचा अर्थ असा की या देशात धर्म, जात, लिंग या गोष्टी गौण आहेत. देशाच्या संरक्षणासाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचं शरद पवार म्हणाले. शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर समाधी परिसर,सातारा याठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना संबंधित केलं.

