• Mon. Mar 9th, 2026

    Sharad Pawar : तिन्ही दलांच्या प्रमुखांचा विरोध असताना ‘तो’ निर्णय घेतलेला! शरद पवारांनी सांगितली खास आठवण

    Sharad Pawar : तिन्ही दलांच्या प्रमुखांचा विरोध असताना ‘तो’ निर्णय घेतलेला! शरद पवारांनी सांगितली खास आठवण

    Sharad Pawar Marathi News : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कामगिरीनंतर, पाकिस्तानने आगळीक करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय लष्कराने तो हाणून पाडला. यानंतर, सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी या ऑपरेशनची माहिती दिली. या निमित्ताने शरद पवारांनी संरक्षण मंत्री असताना महिलांना सैन्यात भरती करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची आठवण करून दिली, ज्यामुळे आज महिला सक्षमपणे देशाचे संरक्षण करत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ७ मे ला एअर स्ट्राईक केले होते. त्यानंतर पाकिस्ताने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानची खोड चांगली माहिती असल्याने भारतीय लष्कराने आधीपासूनच खबरदारी घेतली होती. या घडामोडींबाबत भारताकडून सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी माहिती दिली होती. या दोन्ही महिलांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. याचाच धागा पकडत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी संरक्षण मंत्री असतानाचा आपण महिलांना लष्करामध्ये भरती करण्याबाबत घेतलेल्या मोठ्या निर्णयाबाबतची आठवण सांगितली.

    आपल्या सैन्यदलाची कामगिरी पाहून अभिमान वाटतो. विशेषतः आता सैन्यदल केवळ पुरुषांच्या नव्हे तर महिलांच्याही हाती आहे, त्यांचं कर्तुत्व आज आपल्याला बघायला मिळत आहे हे पाहून आनंद होतो. मला आठवतं, संरक्षण मंत्री असताना दर सोमवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयात एक बैठक होत असे. त्या बैठकीत आर्मी, नेव्ही, एअर फोर्सचे प्रमुख, परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव सहभागी होत. मी एकदा सुचवलं की लष्करात महिलांनाही संधी दिली पाहिजे. तीनही दलांचे प्रमुख म्हणाले की हे शक्य नाही. मी त्यांना विचार करण्यास सांगितलं. पुढील तीन बैठकांनंतरही त्यांनी नकार दिला, आणि चौथ्या बैठकीत मी स्पष्टपणे सांगितलं की देशाच्या संरक्षणविषयक निर्णय घेण्याचा अधिकार जनतेने मला दिला आहे. त्यामुळे इथून पुढे भारताच्या सैन्यात किमान नऊ टक्के महिला असतील आणि त्यांना संधी दिली जाईल, असं शरद पवार यांनी सांगितलं.
    गगनयान मोहिमेच्या ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन यांना परत बोलावलं, India-Pakistan Tension दरम्यान मोठा निर्णय
    आज आपण पाहतो की पाकिस्तानच्या सीमेवर घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण करणाऱ्या दोन महिला आहेत, त्यातील एक बेळगावमधील आणि मुस्लिम समाजातील आहे. याचा अर्थ असा की या देशात धर्म, जात, लिंग या गोष्टी गौण आहेत. देशाच्या संरक्षणासाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचं शरद पवार म्हणाले. शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर समाधी परिसर,सातारा याठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना संबंधित केलं.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed