• Mon. Mar 9th, 2026

    Kalyan BJP : कल्याणात भाजपचा दुटप्पीपणा? एकीकडे बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोहीम, दुसरीकडे त्यांच्यासाठी वकिलीचा आरोप

    Kalyan BJP : कल्याणात भाजपचा दुटप्पीपणा? एकीकडे बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोहीम, दुसरीकडे त्यांच्यासाठी वकिलीचा आरोप

    Kalyan BJP VS Shiv Sena UBT : कल्याणमध्ये, एका बाजूला भाजप नेते बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे कल्याण पूर्व भाजप युवा मोर्चा अध्यक्षांनी बांगलादेशी महिलांच्या बचावासाठी वकिलपत्र स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाने भाजपवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    प्रदीण भणगे, कल्याण : “एका बाजूला भाजपचे वरिष्ठ नेते जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांची भेट घेऊन बांगलादेशी घुसखोरांना पकडून त्यांच्या मायदेशी पाठवण्याची मागणी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला कल्याण पूर्व भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तथा वकील एस.ए.दुबे हेच मानपाडा पोलिसांनी पकडलेल्या सहा बांगलादेशी महिलांच्या बचावासाठी वकीलपत्र स्वीकारून न्यायालयात बाजू मांडत असल्याने भाजपची दुटप्पी भूमिका समोर आली आहे”, असा आरोप ठाकरे गटाचे पदाधिकारी नारायण पाटील यांनी केला आहे.

    पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, राज्यभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कल्याण, डोंबिवली परिसरात पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात शोध मोहीम सुरु केली आहे. कल्याण उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत 38 बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील सहा महिला बांगलादेशी नागरिकांना डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे ना पारपत्र आहे ना व्हिसा, एजंटांच्या मदतीने त्यांनी भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याचे उघड झाले आहे.

    या महिलांविरुद्ध पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3, 4 तसेच परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14, 14(अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण, याच महिलांसाठी कल्याण पूर्व भाजप युवा मोर्चा अध्यक्ष एस .ए. दुबे यांनी न्यायालयात वकिली स्विकारल्याने भाजपची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर आली आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

    या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी नारायण पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “त्यांनी राजकारणा बरोबर वकिली देखील करावी पण आपण वकीलपत्र कोणाचे घ्यावे याचे भान त्यांना हवे होते. कारण एकीकडे बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांना हाकलून लावण्याचे घोषवाक्य देणारे भाजप नेते देशभक्तीची भाषा करतात, तर दुसरीकडे त्यांचेच पदाधिकारी न्यायालयात त्या घुसखोरांचं रक्षण करत आहेत. हीच भाजपची खोटी हिंदुत्वाची आणि बनवाबनवी देशभक्तीची ओळख आहे”, असा खळबळजनक आरोप नारायण पाटील यांनी केला आहे.

    नारायण पाटील यांनी नेमके काय आरोप केले?

    “कल्याण पूर्वेतील सत्येंद्र दुबे हा भाजप युवा मोर्चाचा मंडळ अध्यक्ष आहे. पोलीस बांगलादेशींना पकडून आणतात. त्यांचे वकील पत्र दुबे घेतो. बांगलादेशींना सोडविण्याचे काम हा भारतीय युवा मोर्चाचा अध्यक्ष करीत आहे. ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. भाजप हे देशभक्तीच्या बाता करते. त्यांचे कार्यकर्ते काय करतात? सत्येंद्र दुबे हे भाजपाचे नाही तर संघाचे कार्यकर्ते आहेत. याबाबत भाजपने त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. अन्यथा दुबे हे नेत्यांच्या सांगण्यावरुन हे करीत असल्याचा अर्थ होईल”, अशी टीका ठाकरे गटाचे नारायण पाटील यांनी केली.

    ‘या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही’, दुबे यांचा खुलासा

    काही दिवसापूर्वी मानपाडा पोलिासांनी चार बांगलादेशी महिलांना पकडले होते. ज्या बार गर्ल होत्या. त्या प्रकरणात दुबे यांनी वकिलपत्र घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. यासंदर्भात दुबे यांचे म्हणणे आहे की, त्या दिवशी सुट्टीचे कोर्ट असल्याने न्यायालयाने माझ्या सहाय्यकाला वकील पत्र घेण्यास सांगितले होते. त्यानंतर मला माहिती पडल्यावर या प्रकरणातून मी माघार घेतली आहे. त्याची कॉपी कोर्टाच्या रेकार्डवर आहे. या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असं दुबे यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed