• Wed. Mar 11th, 2026

    प्रदूषण करणाऱ्या वाहनांना इंधनच नाही, प्रताप सरनाईकांचा जालीम तोडगा, पेट्रोल पंपावरच ‘नाकेबंदी’

    प्रदूषण करणाऱ्या वाहनांना इंधनच नाही, प्रताप सरनाईकांचा जालीम तोडगा, पेट्रोल पंपावरच ‘नाकेबंदी’

    Pratap Sarnaik : दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत आहे. पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वेगाने होते. त्यासाठी राज्य शासनाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) प्रत्येक वाहनाला लागू केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहन धारकांना आता अद्दल घडणार आहे. कारण अशा वाहन धारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

    मंत्रालयातील दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत सरनाईक बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.

    काय घडणार नेमके बदल?

    दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत आहे. पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वेगाने होते. त्यासाठी राज्य शासनाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) प्रत्येक वाहनाला लागू केले आहे. परंतु ही प्रमाणपत्रं वाहनधारक चुकीच्या पद्धतीने प्राप्त करुन घेतात किंवा ती बोगस असल्याच्या तक्रारीही परिवहन विभागाला मिळाल्या आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहनं रस्त्यावर आल्याने वायु प्रदूषणात वाढ होत असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले.
    HSC Results : नौदलातून सेवानिवृत्त, 76 व्या वर्षी आजोबांनी पुन्हा ठरवलं, बारावी पहिल्याच प्रयत्नात पास, LLB ही करण्याचा ध्यास
    वाढत्या वायू प्रदूषणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) वेगाने घसरत चालला आहे. त्याला बऱ्याच अंशी तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहने जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात क्यूआर कोड आधारित प्रदूषण नियंत्रणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनाची हवा गुणोत्तर निर्देशकांनुसार तपासणी केली जाईल. ज्यांच्याकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल त्यांनाच इंधन दिले जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

    No PUC No Fuel : प्रदूषण करणाऱ्या वाहनांना इंधन मिळणार नाही, प्रताप सरनाईकांचा जालीम तोडगा, पेट्रोल पंपावरच ‘नाकेबंदी’

    नो पीयूसी नो फ्यूएल अशा प्रकारचे कडक नियम असणारे धोरण लवकरच परिवहन विभागामार्फत आणण्यात येणार आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. आपल्या पिढीने भावी पिढीचाही विचार केला पाहिजे. त्या पिढीला शुद्ध हवा मिळावी, यासाठी आत्ताच वायू प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा कडक नियमांची अंमलबजावणी करणे अपरिहार्य असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed