Nandurbar Congress : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नंदुरबार जिल्हा. मात्र गेल्या सहा वर्षांपासून जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला जिल्हाध्यक्ष मिळालेला नाही.
नंदुरबार जिल्हा म्हटलं तर काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख होती. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यासह बड्या नेत्यांचा जिल्ह्यातील नेत्यांशी घरोबाचे संबंध होते. जिल्ह्यात आमदार, खासदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा एक हाती झेंडा फडकत होता. सध्याच्या घडीला काँग्रेसचा एक खासदार तर एक आमदार आहे. २०१९ मध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेस सोडत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसने पक्षाने अद्याप जिल्हाध्यक्षांची निवड केलेली नाही. कार्याध्यक्ष आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष यांच्यावरच सध्या पक्षाचे काम सुरू आहे. दुसरीकडे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये पक्षाने त्वरित जिल्हाध्यक्ष निवडावा, अशी प्रतिक्रिया आहे.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असले तरी अद्याप जिल्हाध्यक्षाची निवड झालेली नाही. काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या कार्यकाळात नंदुरबार जिल्हाध्यक्ष निवडीसाठी प्रयत्न केले, ते स्वतः जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मात्र त्यावेळी गटबाजी पाहायला मिळाली. या पक्षातही अंतर्गत कुरघुड्या सुरू असल्याने जिल्हाध्यक्ष पदावर आजवर एकमत झाले नसल्याचे पक्षांतर्गत बोलले जात आहे.
काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग
नंदुरबार जिल्ह्यातून लोकसभेच्या निवडणुकीचे शुभारंभ झाला आहे. आधार कार्डचा शुभारंभही नंदुरबार जिल्ह्यातून झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात सध्या भाजपा व शिंदे शिवसेनेची पकड असली तरी. काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आजही आहे. लोकसभेदरम्यान प्रियंका गांधींच्या प्रचार सभेच्या वेळी ते दिसून आले. जिल्हाध्यक्ष नसल्याने प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार शिरीषकुमार नाईक यांच्यावर जबाबदारी आहे. मात्र संघटनात्मक पातळीवर विशेष कामगिरी दिसून येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमधे मरगळ दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षश्रेष्ठींनी पक्षाला उप देणारा जिल्हाध्यक्ष निवडावा अशी चर्चा कार्यकर्ते आपसांत करताना दिसत आहेत.

