• Wed. Jun 17th, 2026

    Kalyan News : धक्कादायक! केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू?

    Kalyan News : धक्कादायक! केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू?

    Kalyan Bai Rukminibai Hospital : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे महिलेला तब्बल 5 तास उपचाराविना ताटकळत ठेवण्यात आलं. योग्यवेळी रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    प्रदीप भणगे, ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पुन्हा एकदा रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णवाहिका न मिळाल्याने 43 वर्षीय सविता गोविंद विराजदार यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सविता विराजदार या कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात वास्तव्यास होत्या. त्यांची आज सकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात आणण्यात आलं होतं. पण रुग्णालयात डॉक्टर अनुपस्थित असल्याने महिलेला उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला होता.

    महिलेला कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णवाहिकेचा शोध घेतला. पण दुर्दैवाने महिलेच्या नातेवाईकांना कल्याण-डोंबिवली महापालिका किंवा खासगी रुग्णवाहिका दोन्ही मिळू शकली नाही. या दरम्यान चार तासांनी रुग्णवाहिका मिळाली. पण एका रुग्णाला घेऊन जाऊ शकत नाही, असं सांगण्यात आल्यामुळे महिलेला बिना उपचाराचं रुग्णालयातच थांबवण्यात आलं, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. तब्बल पाच तास रुग्णालयात उपचाराशिवाय थांबवले गेल्याने अखेर महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत न्यायाची मागणी केली आहे.

    याबाबत कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयाचे डॉक्टर संदीप पगारे यांनी प्रतिक्रिया दिली. ॲम्बुलन्ससाठी दोन्ही मुलांचा डिसिजन होत नसल्याने वेळ गेला, असं सांगत इतर त्यांचा जो आरोप आहे त्याबाबत चौकशी करून कारवाई करणार, असं डॉ. संदीप पगारे यांनी सांगितलं आहे.

    डॉ. संदीप पगारे काय म्हणाले?

    “मी डॉ. संदीप पगारे. मी इथे चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास सविता विराजदार नावाची एक महिला रुग्णालयात उपचारासाठी आली होती. त्यांना डॉक्टर शर्मा यांना तपासून स्ट्रोकसदृश्य लक्षणे असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे पुढच्या इलाजासाठी इंटेन्सी केअर युनिटची आवश्यता आहे. पण ते आपल्याकडे नसल्यामुळे त्यांनी हायफॅसिली सेंटर मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटलला घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. रुग्णासोबत त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघांना याबाबत कल्पना दिलेली होती. त्यांना तातडीने सांगितलं होतं की, महिलेला आयसीयूत भरती करुन सीटीस्कॅन वगैरे करणं गरजेचं आहे”, असा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला.

    “महिलेच्या मुलांना 108 क्रमांकावर रुग्णावाहिका मिळाली नाही. त्यामुळे 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने घेऊन जायचं की खासगी रुग्णवाहिकेने घेऊन जायचं याबाबत त्यांच्यात संभ्रम होता. त्यामुळे महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात उशिर झाला. दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी आम्ही कायदेशीरपणे चौकशी करुन कारवाई करु”, अशी प्रतिक्रिया आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पगारे यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed