• Sun. Mar 8th, 2026
    अजित पवारांनी मुख्ममंत्रीपदाची इच्छा व्यक्त करताच मविआकडून पुन्हा ऑफर, एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत मोठे विधान

    Edited byविमल पाटील | Authored by प्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 4 May 2025, 8:03 pm

    Vinayak Raut offers CM Post to Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा मुख्यमंत्रीपदाची इच्छा उघडपणे बोलून दाखवली आहे. अलीकडेच त्यांनी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात पुन्हा त्यांच्या इच्छेचा उल्लेख केला. यावर आता माजी खासदार विनायक राऊतांनी अजित पवारांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेकदा मुख्यमंत्रीपदाची (Maharashtra CM) इच्छा उघडपणे बोलून दाखवली आहे. अलीकडेच त्यांनी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात पुन्हा त्यांच्या इच्छेचा उल्लेख केला. यावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. अजित पवार म्हणाले, ‘माझीही खूप वर्षांपासून इच्छा मुख्यमंत्री होण्याची पण तो योग जुळून यावा लागतो.’ यावर आता माजी खासदार विनायक राऊतांनी (Vinayak Raut) अजित पवारांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.

    विनायक राऊत म्हणाले, ‘अजित पवार यांनी पुन्हा महाविकास आघाडीमध्ये यावे, त्यांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल.’ एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये दुरी वाढत आहे. शिंदे नैराश्यात गेले आहेत, अशी खोचक टीकाही राऊतांनी केली आहे.

    रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. ‘सध्या फक्त युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण करायची आणि आम्ही खूप काही करायला जाणार आहोत, खूप मोठं काय होणार आहे, खूप मोठा होणार आहे अशी वातावरण निर्मिती करून मोदी साहेबांचे फोटो सातत्याने मीडियावर आणायचे हा एक प्रकारे पक्षाची प्रसिद्धी चालली का ठरवून केली जाते का? हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात येतोय.’ असे राऊत म्हणाले. तर यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भ देत लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल बोलतानाही त्यांनी नाव न घेता राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

    विनायक राऊत म्हणाले, लाडक्या बहिणींना दीड-दीड हजार रुपये देण्याची योजना निवडणुकीच्या तोंडावर आखली. निवडणूक जिंकण्याचा एक जो त्यांचा मानस होता, त्यांच्या नशिबाने ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले. पण आर्थिक तिजोरीचा जो खडखडाट निर्माण झालेला आहे, त्यातूनच आता अनेक लोकोपयोगी योजना जवळजवळ बंद झालेल्या आहेत. त्यात नागरिकांच्या योजना बंद झाल्या आहेत. मागासवर्गीय निधीला काटछाट लावला गेला आहे. त्यामुळे सगळ्या योजना बंद करून लाडकी बहीण योजना राबवून हे आता सध्या सरकारला कठीण जात असल्यामुळे २१०० रुपये तर सोडा पण आता पंधराशे रुपये सुद्धा सरकारला देणे शक्य होणार नाही. पण त्यामुळे आता अशा अनेक मंत्र्यांची बोंबाबोंब आता सुरू होणार आहे, अशी खोचक टीकाही राऊत यांनी केली आहे.

    काश्मीर पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळी उद्धव ठाकरे साहेब गेले. यासंदर्भात प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, ‘हा योगायोग आहे.’ राज व उद्धव ठाकरे या दोघांच्या एकत्र येण्याबद्दलही राऊतांनी प्रतिक्रिया दिली, ‘आज महाराष्ट्रातल्या सर्वच महाराष्ट्रातल्या जनतेचा अशी मनापासून इच्छा आहे. हे सध्याची खुनशी राजवट आणि महाराष्ट्र लुबाडू पाहणाऱ्यांची राजवट उलटून टाकायची असेल तर उद्धव साहेब व राज ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं, अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, ती नाकारता येत नाही.’ असे राऊत म्हणाले.

    देशातले अनेक महामार्ग जे आहेत ते केवळ आणि केवळ ठेकेदारांचं आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा पक्षाचा निधी वाढवण्याचा एकमेव धंदा ठेकेदारांना वारे माप अफाट निधी उपलब्ध करून द्यायचे वाढवायचा हा धंदा भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला आहे असा खळबळजनक आरोप करत आता शक्तिपीठ महामार्ग ज्या मार्गाने जाणार आहे तो संपूर्ण महामार्ग सुपीक शेतकऱ्यांचा आहे आणि त्यामुळे त्या प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केलेला आहे. आज कोकणात कोकणचा जर विचार करायचा झाला तर मुंबई गोवा राज्य महामार्ग आजही पंधरा वर्षे झाली पूर्ण होऊ शकलेला नाहीये कोस्टल महामार्ग जो आहे. तो उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती, तोही अद्याप झालेला नाही. रत्नागिरी नागपूर हा सुद्धा हायवे अद्याप झालेला नाही. या सगळ्या महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचं काम हे सरकार करत असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed