Poisar River Mumbai: मुंबईतील नद्यांची स्थिती पाहिली तर ही नालेसफाई नेमकी कुठे होत आहे, असा प्रश्न निर्माण होत असल्याची जाणीव रिव्हरमार्च या मंचाच्या माध्यमातून रविवारी मुंबई महानगरपालिकेला करून देण्यात आली.
हायलाइट्स:
- ‘रिव्हरमार्च’ कडून नदीकिनारी १५ ठिकाणांची पाहणी
- नदीपात्रात फर्निचर, प्लास्टिक, थर्माकोल, अन्य कचरा
- परिसरामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती
कांदिवलीला पूर्वी जिथे रेल्वेचे फाटक होते त्या भागातही परिस्थिती अशीच होती. या भागातून लाखो लोक प्रवास करतात. मात्र या कचऱ्याकडे आणि नदीच्या या स्थितीकडे दुर्लक्ष केले जाते हे खेदजन्य असल्याची भावना झवेरी यांनी व्यक्त केली. डहाणूकरवाडीच्या स्मशानभूमीजवळ डेब्रीज, कचरा-मैलामिश्रित सांडपाणी आढळले. अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत या नदीमध्ये लोक पोहायला जायचे, येथे मासेमारी व्हायची यावर आजची पिढी कसा विश्वास ठेवेल, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.
मुंबईकरांनो, १७ मे रोजी आवर्जून या !
नदीच्या या अवस्थेसाठी यंत्रणांसोबतच नागरिकही जबाबदार असून नद्यांची ही अवस्था नागरिकांनी प्रत्यक्ष पाहण्याची गरज असल्याचे मत झवेरी यांनी व्यक्त केले. रिव्हरमार्चतर्फे ९ किलोमीटरचा प्रवास सुमारे ५ हजार ५०० पावले चालत केल्यानंतर मुंबईतील ही नदीची प्रत्यक्ष स्थिती यंत्रणांपर्यंत तसेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे झवेरी यांनी सांगितले. अशाच पद्धतीने १७ मे रोजी सकाळी ७ वाजता रुस्तमजी शाळेजवळच्या नदीकाठापासून दहिसर नदीचा तीन किलोमीटरचा प्रवास करण्याचे नियोजन असून यासाठी प्रत्येक मुंबईकराने आवर्जून आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. नदीची स्थिती नागरिक आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिली तरच त्याची स्थिती बदलण्याची आशा व्यक्त होत आहे.

