• Fri. Mar 13th, 2026
    पोयसर नदी की, नाला? पावसाळ्यापूर्वीची स्थिती चिंताजनक; महापालिकेसह स्थानिकही जबाबदार

    Poisar River Mumbai: मुंबईतील नद्यांची स्थिती पाहिली तर ही नालेसफाई नेमकी कुठे होत आहे, असा प्रश्न निर्माण होत असल्याची जाणीव रिव्हरमार्च या मंचाच्या माध्यमातून रविवारी मुंबई महानगरपालिकेला करून देण्यात आली.

    हायलाइट्स:

    • ‘रिव्हरमार्च’ कडून नदीकिनारी १५ ठिकाणांची पाहणी
    • नदीपात्रात फर्निचर, प्लास्टिक, थर्माकोल, अन्य कचरा
    • परिसरामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती
    महाराष्ट्र टाइम्स
    poisar river

    मुंबई : मुंबईमध्ये पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबईतील नद्यांची स्थिती पाहिली तर ही नालेसफाई नेमकी कुठे होत आहे, असा प्रश्न निर्माण होत असल्याची जाणीव रिव्हरमार्च या मंचाच्या माध्यमातून रविवारी मुंबई महानगरपालिकेला करून देण्यात आली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून निघणाऱ्या पोयसर नदीकिनारी १५ ठिकाणांना रिव्हरमार्चच्या माध्यमातून भेट देण्यात आली. या भेटीमध्ये नदीची भीतीदायक परिस्थिती समोर आल्याचे रिव्हरमार्चच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.पोयसर नदीचा उगम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहे. या ठिकाणी मानवी विष्ठेसह, प्लास्टिक, थर्माकोल आणि इतर अनेक प्रकारचा कचरा आढळल्याचे रिव्हरमार्चचे कार्यकर्ते गोपाळ झवेरी यांनी सांगितले. क्रांतीनगर ते महिंद्रा कंपनीचे गेट या दरम्यान नदीच्या पात्रामध्ये त्यांना टाकून दिलेले फर्निचर, थर्माकोलचे तुकडे, प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ पोयसरच्या प्रवाहामध्ये मैलामिश्रित सांडपाणी दिसले. हे पाणी पूर्णपणे काळपट रंगाचे होते. याच मार्गात पुढे पोयसर सेक्शनजवळ झोपडपट्टीतून येणारा कचरा आढळून आला. या भागामध्ये कचऱ्यावर चरणारा सुमारे १०० डुकरांचा कळपही होता. या भागामध्ये कचरा, मैला थेट नदीप्रवाहामध्ये मिसळला जात असल्याचे त्यांना आढळले. या परिस्थितीमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

    कांदिवलीला पूर्वी जिथे रेल्वेचे फाटक होते त्या भागातही परिस्थिती अशीच होती. या भागातून लाखो लोक प्रवास करतात. मात्र या कचऱ्याकडे आणि नदीच्या या स्थितीकडे दुर्लक्ष केले जाते हे खेदजन्य असल्याची भावना झवेरी यांनी व्यक्त केली. डहाणूकरवाडीच्या स्मशानभूमीजवळ डेब्रीज, कचरा-मैलामिश्रित सांडपाणी आढळले. अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत या नदीमध्ये लोक पोहायला जायचे, येथे मासेमारी व्हायची यावर आजची पिढी कसा विश्वास ठेवेल, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.

    मुंबईकरांनो, १७ मे रोजी आवर्जून या !
    नदीच्या या अवस्थेसाठी यंत्रणांसोबतच नागरिकही जबाबदार असून नद्यांची ही अवस्था नागरिकांनी प्रत्यक्ष पाहण्याची गरज असल्याचे मत झवेरी यांनी व्यक्त केले. रिव्हरमार्चतर्फे ९ किलोमीटरचा प्रवास सुमारे ५ हजार ५०० पावले चालत केल्यानंतर मुंबईतील ही नदीची प्रत्यक्ष स्थिती यंत्रणांपर्यंत तसेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे झवेरी यांनी सांगितले. अशाच पद्धतीने १७ मे रोजी सकाळी ७ वाजता रुस्तमजी शाळेजवळच्या नदीकाठापासून दहिसर नदीचा तीन किलोमीटरचा प्रवास करण्याचे नियोजन असून यासाठी प्रत्येक मुंबईकराने आवर्जून आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. नदीची स्थिती नागरिक आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिली तरच त्याची स्थिती बदलण्याची आशा व्यक्त होत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड ; मोठा साठा जप्त – महासंवाद
    मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed