Pune BJP Yuva Morcha Protest : नॅशनल हेराल्ड आरोप प्रकरणावरुन भाजप युवा मोर्चाकडून पुण्यातील काँग्रेस भवनाच्या समोर जावून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस भवन जवळ दाखल झाले आहेत. पुण्यातील बालगंधर्व चौक येथे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. तर काँग्रेस कार्यकर्ते देखील भाजप आंदोलकांचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज आहेत. काँग्रेस कार्यकर्तेदेखील तयारीनिशी काँग्रेस कार्यालयाबाहेर बसले आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्यांकडे लाठ्या-काठ्या आहेत. भाजपचे कार्यकर्ते आले तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस सध्या परिस्थिती हाताळत आहेत. पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजप कार्यकर्त्यांनी याआधीदेखील काँग्रेस कार्यालयावर जावून आंदोलन केलं आहे. अशाप्रकारच्या आंदोलनातून काँग्रेस कार्यालयात तोडफोडीची देखील घटना याधी घडली आहे. त्यामुळे यावेळी भाजप युवा मोर्चाकडून इशारा मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते देखील भाजपचा सामना करण्यासाठी सज्ज झालेले बघायला मिळाले. काँग्रेस कार्यकर्ते लाठ्या-काठ्या घेऊन सज्ज राहिले. आंदोलकांना जशासं तसं उत्तर देऊ असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलं. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
भाजपचे आंदोलक प्रचंड आक्रमक
भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाच्या दिशेला निघाले. ते मोर्चा घेऊन बालगंधर्व चौक येथे आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलकांनी हातात पोस्टर आणले होते. तसेच त्यांनी राहुल गांधी यांचा सोबत आणलेलं पोस्टर फाडलं. याशिवाय राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसने नॅशनल हेराल्ड प्रकरणाबाबत जनतेला चुकीची माहिती देणं बंद करावं, अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली. आंदोलकांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पोलिसांनी आंदोलकांना केलं स्थानबद्ध
पोलिसांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व चौक परिसरात बॅरिकेट्स लावले होते. यावेळी काही आंदोलक एवढे आक्रमक झाले की, ते पोलिसांना न जुमानता बॅरिकेट्स बाजूला करुन पुढे जाऊ लागले. पण पोलिसांनी तातडीने त्यांना रोखलं. पोलिसांनी आंदोलकांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भाजपच्या आंदोलकांना केलं. यानंतर आंदोलकांनी बालगंधर्व चौकात बसून निषेध व्यक्त करण्याची भूमिका घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपण इथेच बसून आंदोलन करत असल्याचं भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी जाहीर केलं. यामुळे मोठा अनर्थ टळला.

