Nagpur Friend Ends Life: मानसिक तणावातून मित्राने आयुष्य संपवलं, तर त्याच्या विरहाने खचलेल्या तरुणानेही आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा निर्णय घेतलेल्या. अवघ्या दोन दिवसात बालपणीच्या मित्रांनी मृत्यूला कवटाळलं.
नेमकं काय घडल?
सचिन देशमुख आणि मोनल जगनाडे (२८) हे दोघे बालपणापासूनचे जिवलग मित्र होते. त्यांच्यात केवळ मैत्री नव्हे तर कौटुंबिक नातंही होतं. दोघेही एकत्र फिरत आणि प्रत्येक गोष्टीत एकत्र सहभागी व्हायचे. मात्र, काही महिन्यांपासून मोनल वैयक्तिक समस्यांमुळे मानसिक तणावात होता. दारूचे व्यसन आणि वैवाहिक जीवनातील संघर्षामुळे मोनल खचून गेला होता. त्यातच पत्नी घर सोडून गेल्याने तो अधिकच एकटा पडला होता. आपले दुःख तो वारंवार सचिनकडे व्यक्त करत राहायचा.
Parbhani News: परभणीत शिक्षकाने आयुष्य संपवलं, अखेरच्या पत्रात संस्थाचालकावर गंभीर आरोप
“तो माझ्याशिवाय राहू शकत नाही, मला त्याला भेटायला जायचं आहे”
१२ एप्रिल रोजी मोनलने मानसिक तणावातून गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. या घटनेचा जबरदस्त मानसिक आघात सचिनवर झाला होता. मित्राच्या निधनाने तो पूर्णपणे खचला होता. त्याने जवळच्या मित्रांना सांगितले की, “माझा मित्र मला बोलावतोय…तो माझ्याशिवाय राहू शकत नाही…मला त्याला भेटायला जायचे आहे.” या भावनिक अवस्थेत १४ एप्रिल रोजी सचिनने विष प्राशन केले. आईने वेळीच लक्ष दिल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद नवीन कामठी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दोन दिवसांत दोन मित्रांनी आपलं आयुष्य संपवण्याचा पर्याय स्वीकारल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना युवकांच्या मानसिक आरोग्याच्या बाबतीत जागरूकतेची गरज अधोरेखित करते. गावात या घटनेबाबत शोक व्यक्त केला जात असून, या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

