सागरी क्षेत्रात लहान मासे पकडण्यावर बंदी असूनही, पिल्ले पकडली जात असल्याने पापलेट मासा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पर्ससीन जाळ्यांमुळे लहान मासे मोठ्या प्रमाणात पकडले जात असल्याने पारंपरिक मच्छीमार चिंतेत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम आशियातील देशांनी मासेमारी बंदीचे नियम कडक करून मासळी साठा वाढवला आहे.
राज्य सरकारने माशांच्या पिल्लांना जाळ्यात न पकडणे, बाजारात पिल्लांचा व्यवहार टाळणे असे उपक्रम हाती घेतले आहेत. मात्र तारली, बांगडा हे मासे पकडण्यासाठी पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करण्यात येत आहे. तळकोकणात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत हे मासे अधिक आढळतात. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सात सागरी जिल्ह्यांपैकी पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिऱ्यापर्यंतच्या किनाऱ्यावर १२ सागरी मैल हद्दीत पर्ससीन नेटद्वारे मासेमारीला बाराही महिने बंदी घालण्यात आली आहे. तर रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत ही बंदी लागू आहे. पर्ससीन नेट असलेल्या बोटींची संख्या कमी करण्यासाठी डॉ. सोमवंशी समितीकडून सूचना देऊनही ही संख्या कमी न होता उलट वाढत असल्याचे अखिल मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी सांगितले.
पर्ससीन नेटचा आस कमी असल्याने यामध्ये लहान आकाराची पिल्लेही अडकतात. त्यामुळे पापलेटच्या पिल्लांचीही कत्तल होत असून पापलेटचा साठा संपुष्टात येण्याची भीती असल्याचे ते म्हणाले. यासाठी पर्ससीन नेटच्या नौकांवर निर्बंध घालण्याची मागणी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छिमार करत आहेत.
ऑस्ट्रेलिया, पश्चिम आशियाचा धडा
अनेक देशांमध्ये महत्त्वाच्या माशांचे प्रजनन आणि संगोपन यासाठी समुद्रात निवडक बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने ग्रेट बॅरियर रीफमधील मासळी साठा वाढविण्यासाठी या क्षेत्रात सेमारीचे अनेक प्रकार टप्याटप्याने बंद केले आहेत. अरबी समुद्रालगतच्या देशांनी मासेमारीबंदी कालावधी वर्षातून तीन महिन्यांपासून पाच महिन्यांपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे मासळी साठा समतोल ठेवण्यात यश आले आहे, याकडेही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छिमार लक्ष वेधत आहेत.

