• Fri. Mar 6th, 2026
    कामराने काहीही चुकीचं केलं नाही, त्याने जनभावना मांडली; उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना ऐकवलं

    Uddhav Thackeray Reaction On Kunal Kamra Issue: कुणाल कामराने एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या गाण्यावरुन सध्या राज्यात वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. यावरुन शिंदे सेनेने संताप व्यक्त करत शोच्या ठिकाणी जाऊन तोडफोडही केली. याबाबत आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या कार्यक्रमात एक गाणं सादर केलं आणि राज्यातील राजकारणात एकच खळबळ माजली. त्याचं हे गाणं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून असल्याने शिंदे सेना चांगलीच संतापली आणि त्यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली. त्यानंतर आता शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाल कामराने काहीही चुकीचं केलेलं नाही, असं ते म्हणाले.

    त्याने जनभावना मांडल्या आहेत – उद्धव ठाकरे

    जे सत्य आहे ती जनभावना त्याने मांडली आहे. जे चोरी करतात ते गद्दार आहेत. मी सर्वप्रथम जनतेला हे स्पष्ट करु इच्छितो की काल कामराच्या तिथे जी तोडफोड झाली त्याच्या शिवसेनेशी काहीही संबंध नाही. ते कदाचित गद्दार सेनेच्या गटाने केली असेल. सध्या जे राज्य चाललं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चाललं आहे की गद्दारांच्या आदर्शाने चाललं आहे, याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे.
    Kunal Kamra: शिंदेंवर गाणं, विमान कंपनीची बंदी ते सुप्रीम कोर्टावर टीका, वाद ओढवून घेणारा कुणाल कामरा नेमका कोण?
    काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरुन त्यांच्या कथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून त्यांनी तोडफोड केली. हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. कोश्यारींनी अपमान केला तेव्हा त्यांचा विरोध करण्याचं धाडस यांच्यात नाही. त्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केलं असं माझं मत नाही, त्याने जनभावना व्यक्त केल्या आहेत. मुख्य म्हणजे, न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे. नागपूरच्या दंगलीत ज्यांचं नुकसान झालं तुम्ही त्यांना नुकसान भरपाई देणार आहात, तसेच, कुणाल कामराने शो केलेल्या ठिकाणाचं ज्याने नुकसान केलं. त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे. या भामट्यांकडून दामदुपटीने वसूल करायला हवं.

    सत्य बोलणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला होऊ शकत नाही. हे सत्य आहे. आम्ही उघड बोलतोय हे गद्दार आहेत. उघड उघड चोरी केली त्यांचं काय. मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांचं राज्यात काही चालत नाही, आम्ही वाट्टेल ते करु शकतो, दाखवण्याचा हा प्रयत्न वेळीच चिरडून टाकला पाहिजे.

    नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती, औरंगजेबाचं थडगं उकरण्याची सुपारी कोणी दिली. नुसतं सुपाऱ्या सुपाऱ्या करु नका, राज्याची वाट लागत चालली आहे. गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं की देव सुद्धा त्यांचं पद वाचवू शकेल का माहित नाही.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed