Raosaheb Danve Allegation over Nagpur Violence : नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण देखील तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधकांनी नागपूर घटनेला सत्ताधारी नेत्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा परिणाम सांगितलं आहे. पण रावसाहेब दानवेंनी आता काँग्रेसवर आरोपास्त्र डागले आहे.
माजी खासदार रावसाहेब दानवे म्हणाले, ‘सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीची तुलना थेट औरंगजेबासोबत केली. सपकाळ यांचं वक्तव्य चुकीचे आहे. यामुळेच नागपूरची घटना घडली आहे.’ तर नागपूरच्या घटनेचा मी निषेध करतो, मात्र महाराष्ट्रात घटना घडल्या नाही पाहिजेत, असेही दानवेंनी नमूद केले.
औरंगजेबाच्या कबरीचा वाद सध्या उफाळला असून आहे. कबर हटवून टाकावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना करत आहेत. सोमवारी सकाळपासून नागपुरात या मागणीसाठी आंदोलन सुरु होते. यावरुनच दोन गट आमने-सामने आले. राडा झाला आणि दगडफेक, जाळपोळही करण्यात आली. यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावर विधानसभेत निवेदन सादर करताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीमध्ये सुनियोजित पॅटर्न दिसून येत आहे. तर यावेळी ३३ पोलीस जखमी झाले असून तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी जखमी झाल्याची बाब देखील फडणवीसांनी निवेदनात नमूद केली.

