• Fri. Mar 13th, 2026
    एका ऑफिसमधून दुसरीकडे फिरवलं , किसान सन्मान निधीसाठी २ वर्ष खेटे, वाट पाहतानाच प्राण सोडले

    Wardha Farmer Death- वर्ध्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा किसान सन्मान निधीच्या प्रतिक्षेतच निधन झाले आहे. दोन वर्षापासून निधीसाठी उंबरठे झिजवत होते मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    वर्धा: केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना असलेली पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Scheme) आहे. या योजनेचा निधी देशभरातली असंख्य लोकांना निधी मिळत असला तरीही काही जण या निधीपासून वंचित राहिले आहेत. काहींना सुरूवातीचे काही हप्ते आले मात्र त्यानंतर निधी बंद झाला. असाच प्रकार वर्ध्यातील (Wardha) एका वयोवृद्ध शेतकऱ्यांसोबत झाला. सुरुवातीला काही हप्ते आल्यानंतर योजनेचा निधी मिळाला नाही. यासाठी त्यांना सरकारी कार्यालयाचे अनेकदा खेटे घालावे लागले मात्र निधी प्राप्त झाला नाही आणि अखेर निधीच्या प्रतिक्षेतच त्यांचा मृत्यू झाला. बाबूलाल आत्राम (वय ९४) असे या शेतकऱ्यांचे नाव आहे.

    बाबूराव आत्राम हे अल्पभूधारक शेतकरी होते.त्यांनी किसान सन्मान निधीचे हप्ते मिळावे यासाठी गेली दोन वर्ष तहसील कार्यालय, कृषी कार्यालय अशा सरकारी कार्यालयात सन्मान निधी मिळावा याकरिता निवेदन, तक्रार केली मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. काही ना काही कारणं समोर ठेवत त्यांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पाठवण्यात आले. स्थानिक आमदार दादाराव केचे यांनीही त्यांच्यासाठी प्रयत्न केले. केचे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही केला होता मात्र तरीही मार्ग निघाला नाही. अखेर किसान सन्मान निधीच्या प्रतिक्षेतच आत्राम यांचे निधन झाले.

    कुटुंबियांची प्रतिक्रिया
    बाबूराव आत्राम यांच्या नातवाने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. माझे आजोबा बाबूराव सीताराम आत्राम हे अल्पभूधारक शेतकरी होते. १२ व्या हप्त्यापासून त्यांचा निधी मिळत नव्हता. तहसिह कार्यालय, कृषी विभाग प्रत्येक कार्यालय गाठले जिल्हाधिकारी कार्यालय राज्याच्या मंत्रीपर्यंत हा प्रश्न घेऊन गेलो. तरी त्यावर काही तोडगा निघाला नाही.

    आतापर्यंत किसान सन्मान निधीचा १९ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. ज्या शेतकऱ्यांना हा निधी मिळत नाही यासंबंधी अनेक कारणे असू शकतात. ज्यात ई केवायसी नसणे, अर्ज करताना शेतकऱ्याने केलेली चूक, शेतजमीनीची पडताळणी झाली नसणे इत्यादी बाबी. मात्र अनेक शेतकऱ्यांना निधी खात्यात जमा होत असताना अचानक बंद झाला असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. त्याबद्दल त्यांनी आत्राम यांच्याप्रमाणेच अनेक कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही समस्याचे निवारण होत नाहीत. त्याकडे गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *