• Sat. Mar 7th, 2026
    हृदयविकाराच्या झटक्याने महिनाभरात दुसऱ्या कुलीचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

    Nagpur News : हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात रेल्वे स्थानकावर एका कुलीचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. मंगळवारी आणखी एका कुलीचा प्लॅटफॉर्मवरच हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली.

    महाराष्ट्र टाइम्स

    म टा विशेष प्रतिनिधी, नागपूर : हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात रेल्वे स्थानकावर एका कुलीचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. मंगळवारी आणखी एका कुलीचा प्लॅटफॉर्मवरच हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. राहुल टेंभुर्णे (वय ४४) असे मंगळवारी मृत्यू झालेल्या कुलीचे नाव आहे.

    कशी घडली घटना?

    सकाळी पावणे नऊच्या सुमारास सिकंदराबाद-रायपूर ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर आली. त्यामुळे नेहमीप्रमाणे राहुलने तिकडे धाव घेतली. मात्र त्याला काहीच काम मिळाले नाही. त्यामुळे तो परतत असताना जागीच कोसळला. आजुबाजूचे कुली आणि सफाई कर्मचाऱ्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला मेयो रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पाटणकर चौक येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या राहुलच्या मागे पत्नी व दोन लहान मुली आहेत.

    अशीच घटना आधीही घडली

    गेल्या महिन्यात म्हणजेच, २७ जानेवारी रोजी नसरु खान या ४० वर्षाच्या कुलीचा प्रवाशाचे सामान चढविताना मृत्यू झाला. लागोपाठ घडलेल्या दोन तरुण कुलींच्या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. दिवस- रात्र रेल्वे प्रवाशांच्या सेवेत असलेल्या कुलींची नियमित आरोग्याची तपासणी करावी, अशी मागणी आता होत आहे. कर्तव्यावर असलेल्या कुलींच्या मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबापुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने शक्य ती आर्थिक मदत करावी, अशी मागणी कुली संघटनेचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांनी केली आहे.

    हातावर पोट असणाऱ्या या कष्टकरी वर्गात हृदयविकाराने मृत्यू होणाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे कर्तव्यावर असताना मृत्यु होण्याचे प्रमाण वाढत आहे. अपेक्षेप्रमाणे काम आणि त्या कामाचा मोबदला न मिळाल्याने, तसेच कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या विचाराने कुलींवर मानसिक ताण पडत असावा. त्यामुळे त्यांचे समुपदेशन करणेही तितकेच गरजेचे आहे जितके, त्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबतचा विचार करण्याची मागणी केली जात आहे.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed