• Tue. Jun 9th, 2026
    MNS Raj Thackeray : अन् राज ठाकरेंनी पत्रकारांना हात जोडले, BMC आयुक्तांची भेट का घेतली? वाचा इनसाईड स्टोरी

    MNS Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत यश मिळालं नसलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झालेले याआधी बघायला मिळाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आज अचानक मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमागील नेमकं कारण काय असेल? याबाबत अनेकांना उत्सुकता होती. अखेर राज ठाकरे यांनी भेटीमागचं कारण सांगितलं. पण पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर राज ठाकरे यांनी उत्तर न देता हात जोडले आणि ते तिथून निघून गेले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आज मुंबई महापालिकेच्या कार्यालयात (BMC) जावून महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी यावेळी महापालिका आयुक्तांसोबत दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. याबाबत स्वत: राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी नेमकी काय चर्चा झाली, या विषयी माहिती दिली. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकारांना एक प्रश्न विचारला. “किती वर्षाने या वास्तूत आलात?”, असा प्रश्न राज ठाकरेंनी पत्रकारांना विचारला. “मीच जवळपास चार-पाच वर्षांनी येत असेल”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

    “मी मुंबई महापालिका आयुक्तांच्या कानावर दोन विषय घातले आहेत. एक म्हणजे मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या ज्या जमिनी आहेत, मग त्या रिलायन्सच्या असतील, अदानीच्या असतील किंवा इतर कंपन्यांच्या असतील, आज मुंबई महापालिकेची एकूण आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून येणारे पैसे हे महापालिका का घेत नाही? त्यांनी आता सांगितलं की तो राज्य सरकारने निर्णय केलेला आहे. पण मला असं वाटतं की, आता आयुक्तांकडून राज्य सरकारला त्याबाबतचं पत्र जाईल आणि महापालिकेला मिळणारे पैसे हे घालवू नयेत अशी आमची इच्छा आहे. एकतर जीएसटी नंतर ऑक्ट्रा बंद झाला आहे. त्यामुळे महापालिकेवर खूप ताण आहे. तो एक विषय होता”, असं राज ठाकरे म्हणाले.

    “तुम्ही सगळ्यांना कर लावणार मग या कंपन्यांना का नाही? बरं या काही धर्मदाय संस्था नाहीत. त्या त्यांचा प्रॉफीट घेतच आहेत. पैसे कमावतच आहेत. मग महापालिकेने यांच्याकडून पैसे का घ्यायची नाहीत? एवढा फक्त विषय आहे. मला असं वाटतं आयुक्त त्यावर काम करतील. हा राज्य सरकारने घेतलेला निर्णय असल्याने आयुक्तांची नोट राज्य सरकारला जाईल त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांसोबत बातचित करेन. पुढे काय होईल ते मला माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

    दुसरा विषय काय?

    “दुसरा एक विषय हा महापालिकेची रुग्णालये होता. या रुग्णालयांमध्ये मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातून येणाऱ्या रुग्णालयांचा विषय नाहीय. पण परराज्यातून येणारे रुग्णांचा जो विषय आहे, महापालिकांच्या रुग्णालयांवर इतका लोड येतो की, सर्व परिस्थिती बिघडते. बरं या सगळ्या गोष्टींचं मुंबई महापालिकेला ओझं व्हायला लागतंय. इतर राज्यांमधून येणारे रुग्ण आहेत, मग त्यांच्या राज्यांच्या महापालिका या मुंबई महापालिकेला काही पैसे देऊ करत आहेत का? की नुसते आपण पेशंट बघायचे आणि आपल्या रुग्णालयावरचा लोड वाढवायचा? या दृष्टीकोनातून वेगळे चार्जेस काही करता येतील का? याबाबत आता आमचं बोलणं झालं”, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

    राज ठाकरेंनी हात जोडले आणि निघून गेले

    राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेनंतर पत्रकारांनी त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा राज ठाकरे यांनी हात जोडले आणि निघून गेले. राज ठाकरे आगामी काळात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठे बदल करणार असल्याची माहिती आहे. ते काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. तसेच शाखाप्रमुखांच्या कामांकडेदेखील राज ठाकरे यांचं विशेष लक्ष असणार आहे. राज ठाकरे यांनी याबाबत पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या तयारीबाबत पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते. पण राज ठाकरेंनी सध्या त्याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं आहे.
    ‘दिल्ली कुणाचीच नाही, इथे राजा येतो आणि निघून जातो, उद्या कुणी गुजरातला जाईल’, राऊतांची फटकेबाजी

    संदीप देशपांडे काय म्हणाले?

    यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आमचं तेच म्हणणं आहे की, जर तुम्ही कचरा संकलनासाठी कर लावत आहेत, आज ज्या झोपडपट्या आहेत, जिथे अनधिकृत कमर्शियल जागादेखील आहेत, तिथे पण तुम्ही कर लावताय. मग महापालिकेच्या जमिनीखालून जाणाऱ्या 42 युटिलिटी आहेत. त्या युटिलिटींपैकी आपण किती लोकांकडून आपण पैसे वसूल करतो? त्यामुळे त्यांच्याकडून कर वसूल केला तर 8 ते 10 हजार कोटींचं उत्पन्न हे महापालिकेला मिळू शकतं. त्याचदृष्टीने महापालिकेने प्रयत्न केले पाहिजेत”, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed