• Tue. Mar 10th, 2026
    Eknath Shinde : ‘…तर शिवसेना फुटलीच नसती’, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

    राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल आगामी काळात वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाची तयारी सुरु आहे. शिवसेनेकडूनही सध्या विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या पूर्वसंध्येला शिवसेना फुटीवर भाष्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे काय म्हणतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. शिवसेना पक्ष दोन गटात विभागला गेला. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्षात फूट पडलीच नसती, असा नवा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. “उद्धव ठाकरेंना खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं. ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. कशासाठी, काय मिळवलं? कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं? तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना नोकर समजायला लागलात. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागलात. मालक आणि नोकर बनून पक्ष मोठा होत नाही”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

    “मला आठवतं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीत राज्यप्रमुखांची बैठक घेतली. तेव्हा एका राज्यप्रमुखाला फोन गेला की कुठे चालला आहात? ते म्हणाले दिल्ली जातोय. तर ते बोलले शिंदेंनी राज्यप्रमुखांची बैठक बोलावली आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मालकासोबत राहणार की नोकरासोबत जाणार?”, असा किस्सा एकनाथ शिंदे यांनी सांगितला.

    “आम्ही खुर्ची शोधली नाही तर माणसं शोधली. त्या माणसांच्या समस्या शोधल्या. त्या माणसांचे प्रश्न शोधले. एकनाथ शिंदेने पदासाठी कधीही मागणी केली नाही आणि तडजोडही केली नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. धर्मवीर आनंद दिघे यांचा विचार पाठिशी आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    ‘काही लोकं वाघाचं कातडं पांघरुन वाघ बनायला जातात’

    “मी त्यादिवशी भगवद्गीतेमधील 111 अध्याय वाचत होतो. त्यातील 18 व्या अध्यायात म्हटलं आहे, बंड तेच करतात जे स्वाभिमानी असतात. स्वाभिमानाला ठेच लागली तरत माणूस बंड पुकारतो. बंड म्हणजे उठाव. जे फक्त चापुलसी करतात ते तिथेच राहतात. पण ते बंड करु शकत नाहीत. उठाव करायला धाडस लागतं. त्याला वाघाचं काळीज लागतं. काही लोकं वाघाचं कातडं पांघरुन वाघ बनायला जातात. पण वाघ तर वाघच असतो”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
    ‘बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाली?’; धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर संजय राऊतांचा सवाल

    ‘तुम्ही काँग्रेसच्या दावणीला धनुष्यबाण बांधला’

    “आपले बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते. एकदा बोललं की बोललं, मग माघार नाही. त्यांचाच चेला हा एकनाथ शिंदे आहे. शब्द दिला. दहावेळा शब्द देताना विचार केला. म्हणून 50 लोक सत्तेतून बाहेर पडतात. माझ्याकडे तर नगरविकास खातं होतं. आठ-नऊ मंत्री होते. आम्ही सत्तेच्या विरुद्ध प्रवाहात उतरलो. कारण शिवसेना वाचवण्यासाठी, शिवधनुष्यबाण वाचवण्यासाठी, जो तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठी आम्ही हे केलं. कारण बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *