सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरणात धसास नेण्यास प्रयत्न करणारे, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती आरोप करणारे भाजप नेते सुरेश धसच मुंडेंना भेटल्याची माहिती काल समोर आली.
धस आणि मुंडे यांच्या भेटीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जात आहे. कारण दोन्ही नेत्यांची भेट बावनकुळेंच्या निवासस्थानी झाली. धस आणि मुंडे यांच्यात संघर्ष पेटल्यानं महायुतीची अडचण झाली. सत्तेत असलेल्या दोन पक्षांच्या नेत्यांमध्येच वाद उफाळल्यानं महायुतीसाठी परिस्थिती अवघड झाली. त्यातच या वादानं जातीय तेढ निर्माण झाली. ती कमी करण्यासाठी बावनकुळेंनी पुढाकार घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
भाजपच्या खेळीला शिंदेंचं प्रत्युत्तर; जनता दरबार भरवणाऱ्या नाईकांना तगडा मंत्री देणार टक्कर
संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे, धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवणारे धसच मुंडेंना भेटल्यानं आता धस किती निकरानं न्यायाची लढाई लढणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यावर बावनकुळेंनी भूमिका स्पष्ट केली. भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा धस यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना त्यांचा लढा सुरु ठेवावा. मुख्यमंत्री फडणवीसांचं पूर्ण पाठबळ धस यांना आहे, असं बावनकुळे म्हणाले.
धस-मुंडे वादाचं नेमकं कारण काय, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. त्याचं उत्तर आता हळूहळू मिळू लागलं आहे. संघर्षाचं मूळ आष्टी मतदारसंघातील वाल्मिक कराडच्या वाढत्या ताकदीत आहे. कराडशिवाय मुंडेंचं पानही हलत नाही. कराड धनंजय मुंडेंच्या अतिशय जवळचा आहे. कराडनं आष्टीत स्वत:ची ताकद वाढवली. आष्टी हा सुरेश धस यांचा मतदारसंघ आहे.
कोकणात ठाकरेसेनेला खिंडार; आणखी एक बडा नेता गळाला; शिंदेंचा धडाका भाजपची चिंता वाढवणारा
वाल्मिक कराड आष्टीतून विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होता. त्यासाठी कराडनं मतदारसंघात जनसंपर्क वाढवला. पण महायुतीच्या जागावाटपात आष्टीची जागा भाजपला गेली. त्यामुळे कराडला माघार घ्यावी लागली. आष्टी वंजारीबहुत मतदारसंघ आहे. तिथून विजयी होण्याची खात्री कराडला होती. पण आष्टी मतदारसंघ भाजपकडे गेला. तिथून धसांना तिकीट मिळालं.
सुरेश धसांच्या पत्नीच्या विरोधात आष्टीत ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे. त्यामागे कराडच असल्याचा दाट संशय धसांना आहे. आष्टीत कराडनं वाढवलेली राजकीय ताकद आणि बायकोविरोधात दाखल झालेला गुन्हा यामुळे धस यांच्या मनात कराडबद्दल राग आहे. तोच वाद टोकाला गेला आणि त्याची परिणिती मुंडे विरुद्ध धस अशा संघर्षापर्यंत पोहोचली.

