• Tue. Mar 10th, 2026
    ठाकरे बापलेक तर फडणवीसांना बंद दाराआड भेटतात, आम्ही काही बोलतो का? पवार गटाचा राऊतांवर पलटवार

    Authored byअनिश बेंद्रे | Contributed by अभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Feb 2025, 1:13 pm

    Sanjay Raut on Sharad Pawar : शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संजय राऊत यांच्यावर शरसंधान साधले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अभिजित दराडे, पुणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार गटाकडून संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेण्यात आला. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे एका महिन्यात तीन-तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांना भेटतात, तेव्हा शरद पवार काही बोलतात का? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संजय राऊत यांच्यावर शरसंधान साधले.

    प्रशांत जगताप काय म्हणाले?

    काल दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दिल्लीत होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला राज्याचे आणि देशाचे लोकनेते म्हणून शरद पवार यांना निमंत्रण असतं. शरद पवार नेहमी जात धर्म पक्ष न पाहता महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करण्याचं काम करतात. असं असताना संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका ही अत्यंत हस्यास्पद आहे, असं प्रशांत जगताप म्हणाले.
    Amol Kolhe : पवारांकडून शिंदेंचा गौरव, संजय राऊतांची तीव्र नाराजी; अमोल कोल्हे म्हणतात, चिडण्याचं कारण स्वाभाविक पण…
    मागचे पंचवीस वर्ष संजय राऊत हे राज्यसभेवर खासदार असताना त्यांना राजकारणाची व्यापक दृष्टी नसेल तर हा त्यांचा पोरखेळ आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे एका महिन्यात तीन तीन वेळेस देवेंद्र फडणवीस यांना भेटतात, बंद दाराआड चर्चा देखील होते, त्यावेळेस काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्षेप किंवा शंका घेत नाही. पण संजय राऊत यांची टीका ही महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकणारी आहे. संजय राऊत आपण 25 वर्षे दिल्लीमध्ये आहात, आपल्या दृष्टीमध्ये बदल करण्याची गरज आहे, असंही जगताप म्हणाले.

    Prashant Jagtap : ठाकरे बापलेक तर फडणवीसांना बंद दाराआड भेटतात, आम्ही काही बोलतो का? पवार गटाचा राऊतांवर पलटवार

    संजय राऊत काय म्हणाले होते?

    राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्यासोबत शरद पवार खुलेआम बसलेले आहेत. त्यांना अशा प्रकारे सन्मान आपल्या हातून देणं, महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का पोहोचवणारं आहे, ही आमची भावना आहे, कदाचित शरद पवारांची भावना काही वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे राजकारण पटलेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed