Tanaji Sawant: माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचं कथित अपहरणनाट्य काल रात्री रंगलं. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज चार्टर्ड फ्लाईटनं काल संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास त्याच्या २ मित्रांसह बँकॉकच्या दिशेनं रवाना झाला.
सोमवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास ऋषिराजनं त्याच्या दोन मित्रांसह चार्टर्ड विमानानं बँकॉकसाठी उड्डाण केलं. ऋषिराज सावंत काही दिवसांपूर्वीच दुबईहून परतला होता. त्यानंतर त्याला बँकॉकला जायचं होतं. त्यासाठी त्यानं आदल्या दिवशी चार्टर्ड प्लेन बुक केलं. त्यावरुन सावंत कुटुंबात ९ फेब्रुवारीला जोरदार वाद झाला. त्यानंतर ऋषिराज बँकॉकला जाणार नाही, असं वडील तानाजी सावंत यांना वाटलं. पण तसं घडलं नाही. कुटुंबियांचं न ऐकता ऋषिराज दोन मित्रांसह विमानानं बँकॉकला निघून गेला.
माघारी फिरा! पायलटला सूचना; सावंतांच्या मुलाला परत आणण्यात बड्या नेत्याची महत्त्वाची भूमिका
ऋषिराज बँकॉकला निघून गेल्याचं समजताच तानाजी सावंतांना धक्का बसला. त्यांना मुलाला परत आणायचं होतं. त्यासाठी त्यांनी आपलं राजकीय वजन वापरण्यास सुरुवात केली. विमान परत फिरवण्यासाठी तसंच महत्त्वाचं कारण गरजेचं होतं. ऋषिराज कायदेशीरदृष्ट्या सज्ञान असल्यानं त्याला माघारी आणण्यासाठी कायद्याच्या पातळीवर ठोस कारण आवश्यक असल्यानं सिंहगड पोलिसात थेट अपहरणाची तक्रार देण्यात आली.
बँकॉकला निघालेलं विमान हवेत असताना मुरलीधर मोहोळ मंत्री असलेल्या नागरी उड्डाण विभागात वेगवान घडामोडी सुरु झाल्या. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधण्यात आला. मग एटीसीनं ऋषिराज प्रवास करत असलेल्या विमानाच्या पायलटशी संपर्क केला. साडेचार वाजता उड्डाण केलेलं विमान त्यावेळी बंगालच्या उपसागरावरुन उड्डाण करत होतं. तातडीनं माघरी फिरा, अशी सूचना एटीसीकडून पायलटला देण्यात आली.
सावंत म्हणतात, लेकाचं अपहरण नाही! पण FIRमध्ये वेगळाच तपशील; ऋषिराज कुठे गेला? संशय का वाढला?
एटीसीकडून सूचना मिळताच चार्टर्ड विमानाच्या पायलटनं हवेतच यूटर्न घेतला आणि पुण्याच्या दिशेनं प्रवास सुरु केला. या सगळ्या घडामोडींबद्दल विमानात बसलेला ऋषिराज अनभिज्ञ होता. पुढील काही तासांनंतर विमान पुण्यात उतरलं. बँकॉकला जायला निघालेला ऋषिराज विमानातून उतरला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. सर्वसामान्यांना छळणारी प्रशासकीय, सरकारी यंत्रणा बड्या नेत्यांसाठी कशी राबते, त्याचा प्रत्यय या कथित अपहरणनाट्यामुळे पुन्हा आला.

