सन २०२४मध्ये गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ या आजारांमुळे ३,९९१ जण बाधित झाले, तर पंधरा जणांना प्राण गमवावा लागला. मागील चार वर्षांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून दिसून येते.
हायलाइट्स:
- मागील चार वर्षांच्या तुलनेत सन २०२४मधील रुग्णसंख्या सर्वाधिक
- पाण्याच्या गुणवत्तेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त
- टँकरद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याच्या नियमित तपासण्या आवश्यक
जलजन्य आजारांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या गुणवत्तेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक डॉ. माधव साठे यांनी व्यक्त केली. अनेक भागांमध्ये पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही. तिथे टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याच्या किती नियमित तपासण्या केल्या जातात याकडे लक्ष द्यायची गरजही त्यांनी व्यक्त केली.
पाण्यामध्ये जंतूप्रादुर्भाव किती आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पिण्यासाठी योग्य असलेल्या पाण्याचा ‘पीएनपी’ हा शून्य ते अधिकाधिक दोन असावा लागतो. तो जितका अधिक तितके शरीराला घातक असणारे जंतू त्यामध्ये असतात. दूषित पाण्यातून कॉलरा, अतिसार, उलट्या होण्यासाठी कारणीभूत असणारे जंतू माणसाच्या शरीरात जाऊ शकतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Devendra Fadnavis: उद्योगांना त्रास दिल्यास थेट ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांना आदेश
ग्रामीण भागांमध्ये उघड्या विहिरींमध्ये कचरा, सांडपाणी, झाडांचा पालापाचोळा, गुराढोरांचे मलमूत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाचे पाणीही अनेकदा या उघड्या विहिरीतील जलस्त्रोतांमध्ये मिसळून दूषित होते. शहरातील पाणी शुद्ध असते असा समज असतो, मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. ज्या ठिकाणी पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नाही, तिथे इतर स्त्रोतांच्या माध्यमातून येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाते का, हा मुख्य मुद्दा आहे. या पाण्याचीही नियमित स्वरूपामध्ये चाचणी होणे गरजेचे आहे.
पाणी उकळून प्या तसेच बर्फाचे, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी केले आहे. त्यासोबतच दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची नियमित चाचणी होणे गरजेचे आहे याकडे सार्वजनिक आरोग्य अभ्यासक के. जे. म्हात्रे यांनी लक्ष वेधले.
गुणवत्ता निर्देशांक शून्य ते दोन असावा
पिण्यासाठी योग्य असलेल्या पाण्याचा शुद्धतेचा गुणवत्ता निर्देशांक हा शून्य ते जास्तीतजास्त दोन असावा लागतो. तो जितका अधिक असतो तितकी त्यात घातक जंतू असण्याची शक्यता असते. त्यावरून शंभर मिली पाण्यामध्ये किती जंतू आहेत हे लक्षात येते. हे जंतू अधिक असल्यास त्या पाण्यामध्ये माणसाची विष्ठा मिसळल्याचा निष्कर्ष काढता येतो. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता कशी आहे हे स्पष्ट होते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

