• Sun. Mar 15th, 2026

    रायगडचं पालकमंत्रिपद कोणाला? विषय लटकलेला असताना भाजपची मोठी घोषणा; बड्या नेत्यावर जबाबदारी

    रायगडचं पालकमंत्रिपद कोणाला? विषय लटकलेला असताना भाजपची मोठी घोषणा; बड्या नेत्यावर जबाबदारी

    पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच सर्वात तीव्र पडसाद रायगडमध्ये उमटले. शिवसेना पालकमंत्रिपदासाठी प्रचंड आग्रही असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    रायगड: पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच सर्वात तीव्र पडसाद रायगडमध्ये उमटले. शिवसेना पालकमंत्रिपदासाठी प्रचंड आग्रही असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. त्यात रायगडचं पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरेंचं नाव होतं. सेनेचा तटकरेंच्या नावाला तीव्र विरोध असतानाही त्यांचीच वर्णी लागली. त्यामुळे शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली. परिणामी परदेश दौऱ्यावर गेलेल्या फडणवीसांना रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली. रायगडसह नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीलादेखील सेनेच्याच विरोधामुळे स्थगिती मिळाली.

    मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरुन परतून १० दिवस उलटले आहेत. तरीही त्यांनी रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न सोडवलेला नाही. त्यामुळे सेनेत नाराजी आहे. उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे अधूनमधून महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहत आहेत. त्यामुळे अनेकांनी याचा संबंध पालकमंत्रिपदाशी जोडला आहे. त्यातच आता भाजपनं आता १७ नेत्यांची एक भलीमोठी यादी प्रसिद्ध केली आहे.
    ठाण्यात जनता दरबार घेणाऱ्या नाईकांना बूस्टर; शिंदेंना भिडणाऱ्या मंत्र्याकडे मोठी जबाबदारी
    राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडे पालकमंत्रिपद आहे. याच १७ जिल्ह्यांसाठी भाजपनं संपर्कमंत्री जाहीर केले आहेत. सरकारसोबतच्या समन्वयासाठी या नेत्यांची नेमणूक करत असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. पण भाजपची हे पाऊल मित्रपक्षांच्या पालकमंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रायगडसाठीही भाजपनं संपर्कमंत्री जाहीर केला आहे. आशिष शेलार यांच्याकडे भाजपनं रायगडचं संपर्कमंत्रिपद दिलं आहे.

    महाडचे आमदार असलेले भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. जिल्ह्यातील सेनेचे अन्य आमदारही त्यांच्याच नावासाठी आग्रही आहेत. असं असताना रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंना देण्यात आलं. त्यानंतर शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळत आपला निषेध व्यक्त केला. भरत गोगावले पालकमंत्रिपदासाठी बऱ्याच भेटीगाठी घेत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही.
    भाजपचे नेते सतरा, मित्रपक्षांना खतरा? दादा, भाईंना धक्का देण्यासाठी नवा डाव; यादी समोर
    रायगडच्या पालकमंत्रिपदाचा पेच कायम असताना भाजपनं जिल्ह्यासाठी संपर्कमंत्री जाहीर केला आहे. मुंबईत उत्तम जनसंपर्क असलेल्या आशिष शेलारांकडे भाजपनं संपर्कमंत्रिपद दिलं आहे. मित्रपक्षांवर वरचढ ठरण्यासाठी भाजप संपर्क मंत्रिपदाच्या माध्यमातून पद्धतशीर खेळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed