• Mon. Mar 9th, 2026
    शिवराज राक्षेला काका पवारांचा पाठिंबा; म्हणाले, ‘आम्ही ऑल इंडिया फेडरेशनकडे…’

    Maharashtra Kesari row : अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाचे गालबोट लागले आहे. हा विषय राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. शिवराज राक्षेची पाठ टेकली का? यावर पंचांच्या निर्णयाबाबत सर्वत्र आक्षेप घेतले जात आहेत. तर राक्षे आणि गायकवाडाच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात कुस्तीगीर वस्ताद काका पवार यांनी आवाज उठवला आहे.

    Lipi

    पुणे : अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाचे गालबोट लागले आहे. हा विषय राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. शिवराज राक्षेची पाठ टेकली का? यावर पंचांच्या निर्णयाबाबत सर्वत्र आक्षेप घेतले जात आहेत. मात्र, पंचाला लाथ मारल्याच्या आरोपावरून शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर कारवाई करत त्यांना तीन वर्षांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात कुस्तीगीर वस्ताद काका पवार यांनी आवाज उठवला आहे. ‘आम्ही ऑल इंडिया महासंघाकडे (फेडरेशन) दाद मागू,’ असा थेट इशारा त्यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला दिला आहे.

    पंचांच्या निर्णयावर काका पवार काय म्हणाले?

    ‘कालची कुस्ती चितपट झालीच नाही. दोन्ही खांदे जमिनीला टेकले असते, तरच कुस्ती चितपट ठरली असती. मात्र, येथे मोठी चूक पंचांनी केली आहे. त्या रेफरीला १० वर्षांसाठी कुस्तीमधून निलंबित केले पाहिजे. आम्ही फेडरेशनसमोर जाऊन सत्य उघड करण्यास तयार आहोत. जर त्यांनी आमच्या विरोधात निर्णय दिला, तर आम्ही तो मान्य करू. पण या निलंबनाविरोधात आम्ही ऑल इंडिया फेडरेशनकडे न्याय मागू. तिथे न्याय मिळाला नाही, तर आम्ही थेट वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनकडे जाऊ.’ अशी भूमिका काका पवारांना मांडली.

    ‘आम्ही न्याय मागायला आलो, तर तुम्ही हाकलून लावता. वर आम्हाला ‘तुमची काय लायकी आहे’ असं बोलता? तो आमचा मल्ल डबल महाराष्ट्र केसरी आहे,” असे संतप्त उद्गार देखील काका पवार यांनी काढले.

    ‘हा खेळाडूंवरील राजकीय डाव’

    ‘ही संपूर्ण घटना म्हणजे खेळाडूंसोबत राजकीय खेळी आहे. पण खेळाडूंसोबत राजकारण करू नका. शिवराज राक्षे आमचाच आहे, पृथ्वीराजही आमचाच आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडू आमचेच आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा,’ असे आवाहनही पवारांनी केले.

    महाराष्ट्र केसरी स्पर्धा बेकायदेशीर होती का?

    या प्रश्नावर काका पवार संतापून म्हणाले, “हो, महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली, पण तिचे प्रमाणपत्र पोलिस भरतीसाठी वैध नाही. तुमचे कोणतेही प्रमाणपत्र वैध नाही, पण बाळासाहेब लांडगे आणि पवार साहेबांच्या सहीचे पत्र मात्र मान्य होते. मग तुमचे कसे चालते?”

    ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेत दोन वेगवेगळ्या संघटना आहेत, आणि या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मग अशा परिस्थितीत तुम्हाला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा अधिकार कोणी दिला? त्यामुळे आम्ही ही स्पर्धा मान्य करू शकत नाही.’ या संपूर्ण वादामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेभोवती नवा वाद निर्माण झाला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed