कल्याण पूर्वेतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या अंगावर भरधाव वेगातील थार वाहन घालून त्या विद्यार्थ्याच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा, तसेच अपहरण करण्याचा प्रयत्न सोमवारी दुपारी घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.
श्लोक सावंत हा बिर्ला महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवारी दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर श्लोक सावंत आपल्या मित्रांसह दुचाकीवरून घरी निघाला होता. यावेळी सुयश तिवारी नावाचा तरूण थार वाहनाने श्लोक सावंतचा पाठलाग करत होता. ही बाब प्रवासात असताना श्लोकच्या लक्षात आली नाही. परंतु, लोकग्राम येथील घराजवळ श्लोक मित्राच्या दुचाकीवरुन उतरला. त्यानंतर तो घरी पायी जात असताना अचानक पाठलाग करत असलेला सुयश तिवारी तेथे पोहोचला. त्याने श्लोकच्या अंगावर थार घालण्याचा प्रयत्न केला. या धडकेत श्लोक थोडक्यात बचावला. या घटनेनंतर सुयशचे दोन साथीदार वाहनातून खाली उतरले. त्यांनी श्लोकला मारहाण करून त्याला जबरदस्तीने वाहनात बसवण्याचा प्रयत्न करू लागले. श्लोकने त्यांना प्रतिकार केला. आपले अपहरण होत असल्याचे लक्षात येताच श्लोक सावंतने आरडाओरडा केला. आता लोक जमा होतील या भीतीने सुयश तिवारी आणि त्यांचे साथीदार तिथून निघून गेले.
श्रीलंकन नौदलाच्या गोळीबारात ५ भारतीय मच्छिमार जखमी; कारवाईनंतर लंकेकडून संतापजनक स्पष्टीकरण
या प्रकारानंतर श्लोकच्या आईने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात मराठी माणसांनी फक्त परप्रांतीयांच्या हातचा मार खात राहायचे का? महाराष्ट्रात मराठी माणुस सुरक्षित नाही का?, असे प्रश्न श्लोकची आई जुही सावंत यांनी विचारले. या सगळ्या प्रकरणी कोळसेवाडीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली. ‘काल विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले होते. त्यावरुन एनसी दाखल झालेली आहे. या प्रकरणातील फिर्यादी आज परत आला होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल. हा प्रकार अपहरणाचा वाटत नाही. कॉलेजमधील वादातून ही घटना घडली आहे,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.
