Shevneri Hapus GI Tag: जुन्नरच्या वैशिष्ट्यपूर्ण शिवनेरी हापूसला केंद्र सरकारने भौगोलिक मानांकन म्हणजेच ‘जिओग्राफिकल इंडिकेशन’चा (जीआय टॅग) मान दिला आहे.
केंद्र सरकारच्या चेन्नई येथील जिओग्राफिकल इंडिकेशन्स विभागाने बुधवारी सकाळी या संदर्भातील शासकीय जर्नल प्रसिद्ध केले. यात शिवनेरी आंब्याबरोबरच कृषी विभागात अमरावतीतील पिंपळी ही औषधी वनस्पती, अमरावतीतील चणा आणि अकोल्यातील काग्जी लिंबालाही ‘जीआय टॅग’ देण्यात आला आहे. भौगोलिक मानांकन विषयाचे अभ्यासक गणेश हिंगमिरे यांनी या उत्पादनांचा प्रस्ताव आणि तज्ज्ञ समितीसमोर बाजू मांडली होती. जुन्नरच्या हापूसला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी तीन वर्षे पाठपुरावा केला. जुन्नर भागातील पिकणारा हापूस आकार, वजन, चव, रंग आणि वास या बाबतीत इतर आंब्यांपेक्षा आणि रत्नागिरी हापूसपेक्षा पूर्ण वेगळा आहे. ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये मध्ययुगीन कालखंडातील आणि शिवकाळातील या आंब्याचे उल्लेख आहेत.
Nitin Gadkari: वर्षभरात १.६८ लाख मृत्यू; वाढत्या रस्ते अपघातांबाबत नितीन गडकरींनी सांगितलं धक्कादायक कारण
या आंब्याला ‘जीआय टॅग’ मिळण्याची संकल्पना हिंगमिरे यांनी प्रशासनासमोर मांडली होती. आंब्याच्या माहिती संकलनाची जबाबदारी नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रावर सोपवण्यात आली. हापूस म्हणजे रत्नागिरी किंवा देवगडचा ही ओळख असल्याने जुन्नरचा हापूस या प्रस्थापितांपेक्षा वेगळा कसा हे शास्त्रीयदृष्ट्या पटवून देण्याचे मोठे आव्हान अभ्यासकांसमोर होते. आगरकर संशोधन संस्थेने शिवनेरी हापूसचे ‘डीएनए प्रोफायलिंग’ करून त्याचा वेगळेपणा सिद्ध केला. नारायणगावच्या ‘केव्हीके’ चे प्रमुख तात्या मेहर यांच्या सहकार्याने हिंगमिरे यांनी आंब्याचा सविस्तर प्रस्ताव तयार केला. त्यात शास्त्रीय, भौगोलिक तांत्रिक माहितीसह ऐतिहासिक संदर्भ पुराव्यांसह जोडण्यात आले होते. संशोधनाचे दिले पुरावे संशोधनादरम्यान सातवाहनकालीन ‘गाथासप्तशती’ या ग्रंथात येथील आंब्याचा उल्लेख मिळाला.
निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या जुन्नरमधील महालाला आजही ‘हापूस बाग’ नावाने ओळखले जाते. पेशवेकालीन बखरीतही जुन्नरच्या हापूसचे सविस्तर वर्णन आणि बागेविषयाची माहिती मिळाली. वनस्पती अभ्यासकांनी या बागेतील काही झाडांचा घेर आणि तांत्रिक गोष्टी तपासून ही झाडे बुजुर्ग असल्याचे स्पष्ट केले. शास्त्रीय धतीवर वेगळेपणा आणि ठोस ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे आम्हाला जुन्नरच्या हापूसचा वेगळेपणा सिद्ध करता आला. आतापर्यंत महाराष्ट्रात कोकण हापूस आणि मराठवाड्यातील केशर आंब्याला ‘जीआय टॅग’ मिळाला आहे, असे गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.
फडणवीसांचा आमच्या घरी १८ तास मुक्काम, मीठ-भाकर खाल्ली, पिंपरीबुटीतील शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
हरभऱ्याची कीर्ती देशभर अमरावती जिल्हा प्रामुख्याने मेळघाट आणि सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये विभागाला गेला आहे. पूर्णा नदीचा उगम सातपुडा पर्वतांमधून होतो. पूर्णा नदीच्या खोऱ्याच्या जवळ खारपण पट्टा म्हणजेच खारे पाण्याचे क्षेत्र विस्तारले आहे. त्या भागातील मातीत क्षार अधिक असल्याने कोणतेही पीक घेतले जात नाही. मात्र, हरभऱ्याचे पीक उत्तम होत असून, त्याच्या चवीत नैसर्गिक मिठाची चव जाणवते. या वैशिष्ट्यपूर्ण चण्याचे गुणधर्मही उल्लेखनीय आहेत. त्यामुळे अमरावतीच्या चण्यालाही ‘जीआय टॅग मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस राज्याचे ३१वे मुख्यमंत्री! ‘या’ दिग्गजांनी सांभाळली महाराष्ट्राची धुरा
‘पानपिंपळी सातपुडा आणि मेळघाटच्या डोंगररांगांच्या पायथ्याला येणारी औषधी वनस्पती आहे. त्या भागात पिंपळीची भाजी केली जाते. इतर राज्यांमध्ये ती मसाले तयार करण्यासाठी पाठवली जाते. खोकला, सर्दीवरील औषधे, च्यवनप्राश तयार करण्यासाठी उपयोगी औषधांमध्ये पानपिंपळीचा उपयोग केला जातो. या वनस्पतीचे महत्त्व माहिती असल्याने अनेक शेतकरी तिची शेती करीत आहेत. पिंपळीचे औषधी गुणधर्म आणि वैशिष्ट्ये लक्षात घेऊन तिला ‘जीआय टॅग’चा सन्मान देण्यात आला आहे,’ असे गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.

