• Sat. Sep 21st, 2024
वंचितमुळे बिघडणार महाविकास आघाडीचे गणित, जागावाटपाचा तिढा न सुटल्याने मित्रपक्ष पेचात

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावशेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चिंता वाढली असून विदर्भातील बुलडाणा, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या काही मतदारसंघातील समीकरणे बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीमुळे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा फटका बसला. विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांचा विचार केल्यास बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीमुळे (पूर्वीचा भारिप बहुजन महासंघ) अनेक मतदारसंघात आघाडीच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. २०१९साली बुलढाण्यात वंचितच्या बळीराम सिरस्कार यांनी १ लाख ७२ हजार ६२७ मते घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा सुमारे १ लाख ३३ हजार मतांनी पराभव झाला. अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे यांना वंचितचे प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे हिदायतुल्ला पटेल यांच्या दुप्पट मते मिळाली. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर, भाजपसमोर आव्हान उभे करता आले असते.
बारामतीचं लोण रावेरमध्येही, मोदींच्या फोटोवरुन तू तू मै मै, नणंद-भावजयीत सोशल मीडिया वॉर
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात वंचितचे डॉ. रमेशकुमार गजबे यांनी १ लाख ११ हजार मते घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार नामदेव उसेंडी यांचा घात झाला. भाजपचे अशोक नेते यांनी उसेंडी यांचा सुमारे ६१ हजार मतांनी पराभव केला. यवतमाळ-वाशीममध्ये वंचितच्या प्रवीण पवार यांची ९४ हजार २२८ मते काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना धक्का देणारी ठरली. त्यामुळे शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सुमारे सव्वा लाख मतांनी ठाकरे यांचा पराभव केला. भंडारा-गोंदियामध्ये भाजपच्या सुनील मेंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना पंचबुद्धे यांचा २ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. तिथे वंचितच्या के. एन. नन्हे यांनी ४५ हजार आणि बसपच्या विजया नांदूरकर यांनी ५२ हजार मते घेतली.

रामटेकमध्येही अशीच स्थिती होती. शिवसेनेचे कृपाल तुमाने यांचे मताधिक्य सव्वालाख राहिले. तर वंचितच्या किरण पाटणकर व बसपचे सुभाष गजभिये यांनी अनुक्रमे ३६ हजार व ४४ हजार मते घेतली. ही मते एकसंध राहिली असती तर तुमाने यांचे मताधिक्य निश्चितच घटले असते. वर्धेत वंचितचे जगदिश वानखेडे यांनी ३६ हजार ४५२ मते घेतल्याने काँग्रेसला विशेष फरक पडला नाही. बसपचे शैलेशकुमार अग्रवाल यांनीही जवळपास तितकीच मते घेतली. मात्र, काँग्रेसच्या चारुलता टोकस यांचा पराभव करणारे भाजपचे रामदास तडस यांचे मताधिक्य पावणे दोन लाखाहून अधिक राहिले. नागपुरातही वंचित वा बसपचा काँग्रेसला काहीच फायदा झाला नाही. भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांचा २ लाख १५ हजार मतांनी पराभव केला. वंचितचे सागर डबरासे यांना २६ हजार तर, बसपचे मोहम्मद जमाल यांना ३१ हजार मते मिळाली.

चार जागांचा प्रस्ताव आंबेडकरांना अमान्य, राऊतांनी वंचितबाबत दिशा स्पष्ट केली

या पार्श्वभूमीवर या लोकसभा निवडणुकीत वंचितने स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचे टाळल्यास त्याचा महाविकास आघाडीला निश्चितच फायदा होईल, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

चंद्रपूर-अमरावतीत परिणाम नाही

विदर्भातील इतर मतदारासंघांच्या तुलनेत चंद्रपूर आणि अमरावती येथे वंचितच्या मतांचा फारसा परिणाम अनुक्रमे काँग्रेसचे बाळू धानोरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित नवनीत राणा यांच्या विजयावर झाला नाही. चंद्रपूरमध्ये वंचितच्या ॲड. राजेद्र महाडोळे यांनी १ लाख १२ हजार ७९ मते घेतली. यानंतरही बाळू धानोरकर यांनी ५ लाख ५९ हजार ५०७ मते घेऊन भाजपच्या हंसराज अहीर यांचा सुमारे ४५ हजार मतांनी पराभव केला. राज्यातील या एकमेव जागेमुळे ‘काँग्रेसमुक्त महाराष्ट्र’ची नामुष्की टळली. अमरावतीम्ध्ये वंचितच्या गुणवंत देवपारे यांना ६५ हजार १३५ मते मिळाल्यानंतरही नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा ३७ हजार मतांनी पराभव केला. वंचितचा उमेदवार नसता तर राणांचे मताधिक्य वाढले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed