प्रफुल पटेल यांनी आज सकाळी मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदारकीची टर्म सुरु होऊन दीड वर्षच झालं असताना, अद्याप साडे चार वर्षांचा कालावधी राहिलेला असताना पुन्हा निवडणूक लढवण्याचं कारण काय असा प्रश्न पटेल यांना पत्रकारांनी विचारला.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मी आज अर्ज दाखल केला. मी याआधीही अर्ज भरला होता. माझ्या खासदारकीची टर्म सुरू आहे. तरीही मी अर्ज भरल्यानं अनेकांकडून तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता मला फक्त इतकंच सांगायचं आहे की काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या. राजकीय जीवनात काम करत असताना आम्हाला काही ना काही घडामोडी कराव्याच लागतात, असं सूचक विधान पटेल यांनी केलं.
माझ्या राज्यसभेच्या जागेसाठी आमच्याकडे अनेक जण उत्सुक आहेत. आजूबाजूला अनेक जण इच्छुक दिसत आहेत. मी आज अर्ज का भरला याचं उत्तर तुम्हाला येत्या काळात मिळेल, असं पटेल म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना जून २०२२ मध्ये राज्यसभेची निवडणूक झाली. त्यावेळी राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहात निवडूनही गेले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. गेल्या वर्षी अजित पवारांचा गट बंड करत सत्तेत सहभागी झाला. त्यांच्याकडून कोणाला राज्यसभेवर पाठवलं जाणार याबद्दल उत्सुकता होती. पण दीड वर्षांपूर्वी राज्यसभेवर गेलेल्या पटेलांनाच राष्ट्रवादीनं पुन्हा संधी दिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
घडामोडी कराव्याच लागतात! खासदार असताना खासदारकी लढवणाऱ्या पटेलांचं सूचक विधान
मुंबई: राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजपनं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तीन नावांची घोषणा केली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना यांनी प्रत्येकी १ उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादीनं प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा केल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पटेल जून २०२२ मध्येच राज्यसभेवर निवडून गेले. त्यांची साडे वर्षांची टर्म अद्याप शिल्लक आहे. तरीही त्यांनी पुन्हा अर्ज का भरला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.